उच्च न्यायालयात याचिका दाखल
वृत्तसंस्था/ चेन्नई
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येकरता दोषी ठरलेले रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत स्पेशल कॅम्पमधून मुक्त करण्याची मागणी केली आहे. रॉबर्ट पायस आणि जयकुमार हे सध्या त्रिची येथील स्पेशल कॅम्पमध्ये आहेत. दोघांनाही मागील वर्षी पुझाल मध्यवर्ती तुरुंगातून त्रिची येथील स्पेशल कॅम्पमध्ये हलविण्यात आले होते. या दोन्ही गुन्हेगारांनी आता मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठासमोर याचिका दाखल केली आहे.
रॉबर्ट पायस आणि जयकुमार हे स्पेशल कॅम्पच्या एकाच खोलीत आहेत. तर अन्य खोलीत एमटी संथान आणि मुरुगन आहेत. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या एमटी संथानने देखील त्रिची स्पेशल कॅम्पमधून मुक्तता करण्याची मागणी केली होती. स्पेशल कॅम्पच्या खोलीची खिडकी बंद असून आम्हाला अन्य लोकांची भेट घेण्यापासून रोखले जात आहे. या स्पेशल कॅम्पपेक्षा तुरुंगच अधिक चांगला होता असा दावा संथानने केला आहे.
राजीव गांधींच्या 6 मारेकऱ्यांची मुक्तता करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये दिला होता. यानंतर या गुन्हेगारांना स्पेशल कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. राजीव गांधी यांची 1991 मध्ये तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदूर येथे आत्मघाती स्फोट घडवून आणत हत्या करण्यात आली होती. मुरुगन, नलिनी, एजी पेरारिवालन, संथान, जयकुमार, रॉबर्ट पायस आणि पी. रविचंद्रन हे याप्रकरणी दोषी ठरले होते. या सर्वांना मृत्युदंड ठोठावण्यात आला होता, परंतु ही शिक्षा नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली होती. एजी पेरारिवालन याची मे 2022 मध्ये तुरुंगातून मुक्तता करण्यात आली होती.