राजमाता कल्पनाराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंवर नाव न घेता केली टीका
प्रतिनिधी/सातारा
ज्यांना काही चांगले करायला जमत नाही ते टीका आणि टीकाच करत असतात. स्वतःच कार्य शून्य आहे. दुसरे जे काम करते त्याला नाव ठेवण्यातच ते पुढे आहेत. उदयनराजे एवढे चांगले उपक्रम राबवत आहेत. त्यांचे कौतुक करायचे सोडून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. जे आरोप करत आहेत, त्यांचेच बगलबच्चे काय उपद्व्याप करतात, हे सगळयांना माहिती आहे. मी एका अंगणवाडी शाळेला भेट दिली होती. तिथे पोषण आहार कसला दिला जातोय. त्यामध्ये भष्ट्राचार झाला आहे. त्यात त्यांच्या बगलबच्च्यांचा हात आहेत. करोडो रुपयांची उलाढाल होते. याची मंत्री महोदयांकडे तक्रार केली आहे, असा निशाणा राजमाता कल्पनाराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंच्यावर साधला.
कास महोत्सवाच्या ठिकाणी शनिवारी दुपारी मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंत्री दीपक केसरकर, खासदार उदयनराजे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राजमाता म्हणाल्या, राजमाता कल्पनाराजे उदयनराजे यांनी शेतकऱ्यांचा विचार करून हे प्रदर्शन भरवले आहे. त्यांचा फायदा तेथील शेतकऱ्यांना व्हावा हा हेतू होता. मंत्री येथे आलेत त्यांनी नगरपालिका शाळेला आणि येथील मुलांना खाजगी शाळेसारख्या सुविधा द्याव्यात. केसरकर यशाचे मोठं व्हिजन आहे, इच्छा शक्ती आहे. ते निश्चित पालिका शाळेसाठी काहीतरी नाविण्यपूर्ण करतील. विद्यार्थी ज्या आत्मविश्वासाने स्टेजवर परफॉर्मन्स करतात. ते विद्यार्थी उद्याचे नेते, कलाकार, डॉक्टर, वकील होतील. मंत्री शिवसृष्टीबाबत बोलले आहेत. ज्यानी शिवसृष्टीची संकल्पना केली ते अमेरिका आहेत. शिवकाल उभे करण्याचा त्यांचा मानस आहे. भारतात एकमेव सृष्टी होणार आहे. सातारची वेगळी ओळख त्यामुळे होणार आहे. आजपर्यंत हे शहर ऐतिहासिक व पेन्शनर शहर म्हणून ओळखले जाते.
आतापर्यंत प्रत्येक नेता आला. त्यांनी आपल्या गावाला मोठं केले. साताऱ्याला मात्र वंचित ठेवले. साताऱ्याचे दुर्दैव म्हणावं लागेल. साताऱ्याला पुढे आणायचे असेल तर त्याच्यासाठी टुरिझम सारखा मोठा प्रकल्प आहे. देशाचे पंतप्रधान यांनी रायगडाबाबत एक व्हिजन ठेवले आहे. तेथील राणी महाल त्याच पद्धतीने उभे करू शकता, विशेष म्हणजे बाजार पेठ चांगली करु शकता, खूप काही करू शकता, शासनाने मनावर घेतले तर सगळे करता येईल. नुसते शिवाजी महाराज की जय म्हणून उपयोग होत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि आचार अंगी बाळगले पाहिजेत. तरच व्यक्तीमत्व घडते. साताऱ्याला खूप करण्यासारखे आहे, असे सांगत राजमातांनी मंत्री केसरकर यांनाच विचारले साताऱ्याला कधी आला होता का?, त्यांनी नाही म्हणताच नुसतं कोकण कोकण फिरत जावू नका, तर इकडे सगळे आहे साताऱ्याला येत जा, अशी विनंती केली.