संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा चीनला कडक संदेश
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिकेच्या भूमीवरून चीनला कडक संदेश दिला आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचला तर आम्ही कोणालाही सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक प्रभावशाली आणि सामर्थ्यवान देश म्हणून उदयास येत आहे. तसेच जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताची वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादनही त्यांनी याप्रसंगी केले.
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाला संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी चीनच्या सीमेवर भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याबद्दलची माहिती दिली. या शौर्यावेळी भारतीय जवानांनी काय केले आणि सरकारने कोणते निर्णय घेतले हे सर्व मी येथे उघडपणे सांगू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जवानांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. तथापि, भारताला त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही कोणालाही सोडणार नसल्याचा संदेश चीनपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी प्रभावीपणे नमूद केले.
भारताचा अभिमान उंचावला
रशिया-युपेन युद्धाच्या संकटावर भारताने घेतलेल्या भूमिकेबाबतही राजनाथ सिंग यांनी भाष्य केले. तटस्थ भूमिका आणि सवलतीच्या रशियन तेल खरेदीच्या निर्णयावर वॉशिंग्टनमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता असताना त्यांची टिप्पणी महत्त्वाची मानली जात आहे. जगभरात आता भारताची प्रतिमा बदलली आहे. भारताचा अभिमान वाढला आहे. जगातील कोणतीही शक्ती भारताला येत्या काही वर्षात जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्था बनण्यापासून रोखू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.