केंद्र सरकारकडून नावात बदल ः सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नावही बदलणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकार लवकरच ‘राजपथ’चे नाव बदलणार आहे. आतापर्यंत ‘राजपथ’ म्हणून ओळखला जाणारा संपूर्ण परिसर ‘कर्तव्यपथ’ म्हणून ओळखला जाणार आहे. ‘राजपथ’सोबतच सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. यासंबंधीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी 7 सप्टेंबर रोजी विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नेताजी पुतळा ते राष्ट्रपती भवन हा संपूर्ण मार्ग आता ‘कर्तव्यपथ’ होणार आहे. शिक्षक दिनानिमित्त सोमवारी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील या पुढील टप्प्याचे उद्घाटन करतील.
नजिकच्या काळात राजपथचे नाव ‘कर्तव्यपथ’ असे करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. नवनिर्मित करण्यात आलेला हा भाग 20 महिन्यांनंतर सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी इंडिया गेट ते मानसिंग रोडकडे जाण्याची परवानगी लोकांना दिली जाणार नाही. उर्वरित भागात पर्यटक फिरू शकतील. मात्र, 9 सप्टेंबरपासून हा संपूर्ण भाग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. येथे 16 पूल (ब्रीज) बांधण्यात आले असून संपूर्ण भागात 1 हजार 125 वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय इंडिया गेटजवळ 35 बसेससाठी पार्किंगची जागा निश्चित करण्यात आली आहे.
दिल्लीत येणाऱया लोकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र असणारा ‘सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू’ पर्यटकांसाठी सज्ज झाला आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पामध्ये संसदेची नवीन त्रिकोणी इमारत, एक सामान्य केंद्रीय सचिवालय, तीन किलोमीटरच्या राजपथाचे पुनरुज्जीवन, नवीन पंतप्रधानांचे निवासस्थान आणि कार्यालये आणि उपराष्ट्रपती भवन यांचा समावेश आहे.
खाद्यपदार्थ स्टॉल्सचे आकर्षण
सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत राजपथाच्या बाजूने प्रत्येक राज्यातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असून चहूबाजूंनी हिरवेगार असलेले लाल ग्रॅनाईट वॉकवे साकारण्यात आले आहेत. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पस्थळी पाच वेंडिंग झोन तयार करण्यात आले असून तेथे 40 स्टॉल्सना परवानगी दिली जाणार आहे. इंडिया गेटजवळ दोन ब्लॉक असून प्रत्येक ब्लॉकमध्ये आठ दुकाने असतील. मात्र, उद्यान परिसरात कोणतेही खाद्यपदार्थ विक्रीस आणि खाण्यास मनाई करण्यात येणार आहे.
कडक सुरक्षेवर भर
प्रकल्प सर्वसामान्य लोकांसाठी खुला झाल्यानंतर तेथे चोवीस तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या सुविधांमध्ये चोरी आणि नुकसान होऊ नये यासाठी पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुमारे 80 सुरक्षारक्षक या मार्गावर लक्ष ठेवणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. तसेच दहशतवादी हल्ल्यापासून सावधानता बाळगण्यासाठी अन्य यंत्रणांची मदतही घेतली जाणार आहे. सर्व परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱयांद्वारेही नजर ठेवली जाणार आहे.