ऑनलाईन टीम/ तरुण भारत
मुंबई: राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात घमासान सुरु आहे. शिवसेनेने आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. पण काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजपने अजून त्यांचे उमेदवार गुलदस्त्यात ठेवले आहेत.दरम्यान, निधी वाटपावरुन शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी राष्ट्रवादी भाजपला बळ देण्याचं काम करत आहे असा आरोप केला आहे. भाजपाने तिसरा उमेदवार जर दिला आणि घोडेबाजार झाला तर भाजप निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत कोणाचे पारडं जड आहे. आणि मतांची गोळाबेरीज काय आहे हे जाणून घेऊया.
राज्यसभेची निवडणूक अतिरिक्त मतांवर होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत याआधीच सांगितले. शिवसेना जो उमेदवार उभा करेल, त्याच्या पाठिशी आमची मतं असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या वेळी शिवसेनेने शरद पवारांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवार फौजिया खान यांच्या पाठिशी त्यांची मतं उभी केली होती. तेव्हा पुढच्या निवडणुकीत आम्ही तुमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, असं शरद पवारांनी शिवसेनेला सांगितलं होतं. या वचनाला जागत राष्ट्रवादी काॅंग्रेसने (NCP) सेनेला पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे.
कोणाचं पारडं जड
राज्यसभेच्या खासदारांची निवड करण्यासाठी विधानसभेतील आमदारांना महत्त्व असते. या निवडणुकीत आमदारांचे मत विचारात घेतले जाते. सध्या भाजपकडे अपक्षासह ११६, राष्ट्रवादी काॅंग्रेस ५४ , आणि शिवसेनेकडे ५६,काॅंग्रेस ४४ आमदार आहेत. त्यानुसार प्रत्येक आमदाराला ४२ मतांची गरज असते. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपला २, शिवसेनेला १,काॅंग्रेसला १, राष्ट्रवादीला १ आणि महाविकास आघाडीं मिळून १ अशा आमदारांच्या संख्येनुसार एक जागा निर्माण होते. मात्र या सहाव्या जागेवरून राज्यात घुमसान सुरु आहे. राज्यसभेसाठी निवडून येण्यासाठी ४२ आमदारांच्या मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे ३५ मतं अतिरिक्त आहेत तर भाजपकडे २२ तसेच अपक्ष ७ असे मिळून २९ मतं आहेत. मात्र जर भाजपने तिसरा उमेदवार जाहिर केला तर संख्याबळानुसार मते फिरू शकतात.आणि भाजप आघाडीवर येऊ शकते.
राज्यसभेसाठी पक्षिय बलाबल किती
सध्या राज्यसभेची सदस्य संख्या २४५ इतकी आहे. यापैकी २३३ सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर १२ सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. प्रामुख्याने कला, विज्ञान, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडीत लोक यामध्ये असावेत असा नियम आहे. म्हणूनच अभिनेत्री रेखा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि मराठा समाजाचे नेतृत्व करणारे छत्रपती संभाजीराजे यांची निवड करण्यात आली होती.संभाजीराजेंनी घेतली माघारदरम्यान आज छत्रपती संभाजीराजे यांनी माघार घेतली आहे. यामुळे भाजपला तिसरा उमेदवार देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर घोडेबाजार झाला तर भाजप मात्र निवडून येण्याची दाट शक्यता आहे.
नाना पटोलेंचा आरोप
काँग्रेसला कमजोर करत भाजपला बळ देण्याचं काम राष्ट्रवादी करतेय असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे काँग्रेस संपवायला घेतलीय अशी तक्रार नाना पटोले यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे केली. या तक्रारीमुळे राष्ट्रवादीला फटका तर भाजपला फायदा होवू शकतो.
मविआत धुसफूस
महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरु आहे. महाविकास आघाडीचं सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे शिवसेनेचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये खदखद राहणार नाही, अशा शब्दात खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना इशारा दिला. तर निधीवाटपावरुन शिवसेना आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही जाहीर व्यासपीठावरुन शिवसेना नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. याचा फटका मविआला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणारा काळच सांगेल भाजप की महाविकास आघाडी बाजी मारेल.
घोडेबाजाराची शक्यता
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्ष्या दिसू लागली आहे. असे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी याआधी केेले होते. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी जर भाजपने घोडेबाजार केला तर ते निवडून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.