ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जून ते ऑगस्ट दरम्यान रिक्त होणाऱ्या 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 24 मे रोजी जारी करण्यात येणार आहे. नॉमिनेशनची शेवटची तारीख 31 मे असेल. उमेदवारी अर्ज छाननीची तारीख 1 जून तर 3 जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. सर्व जागांसाठी 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.
केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) सध्या 95 जागांसह वरच्या सभागृहात अव्वल स्थानी असल्याने भारतात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या राज्यसभा निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचा कार्यकाळ जून-ऑगस्ट या तीन महिन्यांत संपत असल्याने त्यांना पुन्हा निवडून आणणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, जयराम रमेश आणि अंबिका सोनी या प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमधील दिग्गजांचा कार्यकाळही संपत आला आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा वरच्या सभागृहात आणण्यासाठी पक्ष कसोशीने प्रयत्न करेल.
दरम्यान, महाराष्ट्रात सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होईल. शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे पी. चिदंबरम यांची मुदत संपत आहे. तर भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांची मुदत संपत आहे. 31 मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत असून, 10 जून रोजी मतदान होईल.