प्रतिनिधी / बेळगाव
बहीण-भावाचं नातं दृढ करणारी राखी पौर्णिमा गुरुवारी शहर परिसरात घरोघरी उत्साहात साजरी करण्यात आली. बहिणींनी आपल्या भावांना ओवाळून रेशमी धागा बांधला. कोरोनानंतर यंदा रक्षाबंधनाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाजारात गर्दी झाली होती. विशेषतः महिलांनी आपल्या भावांसाठी आवडत्या राख्यांची खरेदी केली. गुरुवारी सकाळपासून घरोघरी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. बहिणींनी भावांना ओवाळून गोडधोड खाऊ घातले. श्रावण व रक्षाबंधनामुळे बाजारात फळे आणि पूजा साहित्यांना मागणी वाढली होती. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयातही विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. काही संघ-संस्थांनीही रक्षाबंधनानिमित्त विविध उपक्रम राबविले.
गतवषीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या दरात वाढ झाली असली तरी यंदा राख्यांच्या खरेदीमध्ये वाढ झाल्याची माहिती व्यापाऱयांनी दिली. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत राखी बांधून भावा-बहिणींनी रक्षाबंधन सण साजरा केला. काही बहिणींनी भावांकडे जात तर काही भावांनी बहिणींकडे जावून राखी बांधून घेतली.
तालुका परिसरातही
किणये : तालुक्यात गुरुवारी नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात वेगवेगळय़ा पद्धतीने नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. प्रेम व आदरभाव व्यक्त करत बहिणींनी भावांना राख्या बांधल्या. राखी बांधून घेत भावांनीही बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी घेतली.
पारंपरिक रक्षाबंधन सणाला आधुनिकतेची साद घातली होती. काही गावांमध्ये कूळ घरांमध्ये सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. घराघरांमध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधताना दिसत होती.
काही गावांमध्ये सकाळी व काही ठिकाणी सायंकाळी रक्षाबंधन झाले. बऱयाच ठिकाणी शाळेला जाण्यापूर्वी बहिणींनी भावंडांना राख्या बांधल्या.
राखी पौर्णिमेची उत्कट आत्मियता
भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जाणारा राखी पौर्णिमेच्या दिवसाची प्रत्येक बहीण व भाऊ आत्मियतेने वाट बघतात. बहिणींनी नवीन ड्रेस, साडय़ा व अलंकार परिधान केले होते. आपल्या भावाला उत्तम आरोग्य लाभून कार्यात यश मिळावे, असे म्हणत त्यांना राख्या बांधत होत्या. भावाला आरती ओवाळून पेढा अथवा गोडधोड भरविताना दिसत होत्या. भाऊ बहिणींना राखी पौर्णिमेनिमित्त साडी, ड्रेस, पैसे अथवा बहिणींच्या आवडीची भेटवस्तू देत होते. नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त लग्न झालेल्या सुवासिनी माहेरी आल्या होत्या.नोकरी, कामधंद्यानिमित्त बाहेरगावी असलेल्या भावांना बहिणींनी पोस्ट, कुरिअरद्वारे राख्या पाठविल्या होत्या. एसएमएस, व्हॉट्सऍप, फेसबूक आदींच्या माध्यमातून भाऊ-बहिणींनी एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.