वृत्तसंस्था/ लखनौ
लोकसभा निवडणुकीत रालोद प्रमुख जयंत चौधरी यांनी भाजपसोबत आघाडी केली होती. त्यांचा हा निर्णय पक्षाच्या अनेक नेत्यांना रुचला नव्हता. आता केंद्रात सरकार स्थापन झाले असून जयंत चौधरी हे मंत्री झाले आहेत. परंतु पक्षातील नाराजी आता उफाळून समोर येत आहे. रालोदचे राष्ट्रीय प्रवक्ते भूपेंद्र चौधरी यांनी राजीनामा दिला आहे.
राष्ट्रीय लोकदलात नेते आणि कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो असे म्हणत भूपेंद्र चौधरी यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. जयंत चौधरी हे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री झाले आहेत. त्यांना शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आले आहे. परंतु आता पक्षाचे अनेक नाराज नेते आता त्यांच्या विरोधात उतरले आहेत. आगामी काही दिवसांमध्ये आणखी काही नाराज नेते रालोदला रामराम ठोकून समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे मानले जात आहे.
रालोद आणि भाजप यांच्याता मागील वर्षी आघाडी झाली होती. तेव्हा माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आल्यावर जयंत चौधरी यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले होते. याच्या काही दिवसांनी आघाडीची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. या आघाडी अंतर्गत रालोदला उत्तरप्रदेशात दोन जागा देण्यात आल्या होत्या. या दोन्ही जागांवर रालोदने विजय मिळविला आहे.