नृपेंद्र मिश्रा यांचे प्रतिपादन : ‘गळती’च्या आरोपावरही स्पष्ट केली वस्तुस्थिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भगवान रामलल्ला यांच्या अयोध्येतील भव्य राममंदिराचे निर्मितीकार्य येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी घोषणा या मंदिराचे वास्तूतज्ञ नृपेंद्र मिश्रा यांनी केली आहे. या मंदिराच्या गर्भगृहात पावसाचे पाणी साचल्याच्या आरोपावरही त्यांनी शास्त्रीय दृष्टीकोनातून वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. मंदिराच्या निर्मितीकार्यासंबंधी जनतेच्या मनात भ्रम निर्माण करण्याचे काम काही हितसंबंधी लोक करीत असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना केला.
राम मंदिराच्या प्रथम मजल्याचे निर्मितीकार्य आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जुलैच्या अखेरपर्यंत ते पूर्ण केले जाईल. उर्वरित निर्मितीकार्य या वर्षाच्या अखेरीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. राम मंदिर निर्मिती वेगाने होत असून ती तज्ञांच्या मार्गदर्शनात होत आहे. निर्मितीकार्याची गुणवत्ता सर्वोत्तम असून हे मंदिर नागर शैलीत निर्माण होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
गळती लागल्याचा आरोप
दोन दिवसांपूर्वी अयोध्येत जोरदार वृष्टी झाली. या पावसात राममंदिराच्या गर्भगृहात पाणी साचल्याचा आणि छताला गळती लागल्याचा आरोप केला जात आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनीही यासंबंधी काही वक्तव्य केले आहे. त्यासंबंधी मिश्रा यांना विचारणा करण्यात आली. छताला गळती लागल्याचा आरोप त्यांनी पूर्णत: फेटाळला. अद्याप राममंदिराचे निर्मितीकार्य पूर्ण झालेले नाही. त्यामुळे छतावर उघड्या राहिलेल्या विद्युत तारांच्या पाईपांमधून पावसाचे पाणी आत आले होते. तथापि, संपूर्ण निर्मितीकार्य पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा एक थेंबही आत येऊ शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. निर्मितीकार्य करताना गुणवत्तेशी तसूभरही तडजोड करण्यात आलेली नाही. रुरकी येथील आयआयटी महाविद्यालयाचे तज्ञ वास्तूविशारद राम मंदिराच्या निर्मितीकार्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवीत आहेत. कोणत्याही प्रकारच्या दुर्लक्षाला येथे स्थान नाही. काही हितसंबंधी लोक हेतुपुरस्सर समाजात भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांचे हे प्रयत्न विफल ठरतील. हे राममंदिर वास्तूनिर्मितीकार्याचे आदर्श उदाहरण ठरणार असून पुढील एक सहस्त्र वर्षे ते अबाधित राहील, अशा प्रकारे त्याची वास्तूरचना करण्यात आली असून अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचा भक्कमपणा आपोआप सिद्ध होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
टिळा लावण्यासंबंधीचे आरोप
मंदिरात येणाऱ्या काही विशिष्ट व्यक्तींनाच प्रभू रामचंद्रांच्या नावाने टिळा लावण्यात येतो, असा आरोप काही प्रसारमाध्यमांमधून केला जात आहे. त्यासंबंधीचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. काही भक्त मंदिरात लवकर आले होते. तोवेळपर्यंत टिळा लावण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी टिळा लावण्यापूर्वीच दर्शन घेतले आणि ते मंदिराबाहेर गेले. तथापि, टिळा आणि भगवान रामलल्लांचे ‘चरणामृत’ मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांना देण्यात येत आहे. कोणालाही कोणत्याही कारणास्तव वंचित ठेवण्यात येत नाही. यासंबंधी प्रसारित होणारी वृत्ते धादांत असत्य आहेत, असेही स्पष्टीकरण त्यांनी केले.
कोट्यावधी भक्तांनी घेतले दर्शन
22 जानेवारी 2024 या दिवशी भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. त्यानंतर हे मंदिर भक्तांसाठी उघडण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत कोट्यावधी रामभक्तांनी रामदर्शन घेतले आहे. प्रतिदिन साधारणत: 75 हजार ते 1 लक्ष भाविक दर्शनासाठी येत आहेत, अशी माहिती या मंदिराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आली आहे.