प.पू. शक्ती शांतानंद महर्षी यांचे उद्गार
प्रतिनिधी/ मडगाव
रामराज्य आम्हाला आत्ता फार दूर नाही, ते जवळ आहे. श्री राम हे राजकारणी होते. भगवान श्रीकृष्ण सुद्धा राजकारणी होते. या रथयात्रेमागे राजकारण नक्कीच आहे. भारतात लाखो वर्षापासूनच राजकारण चालत आलेले आहे. त्यात नाविन्य असे काहीच नाही असे उद्गार प. पू. शक्ती शांतानंद महर्षी स्वामींजी यांनी काल रविवारी दवर्ली येथे बोलताना काढले.
रामराज्य रथयात्रेचे काल संध्याकाळी दवर्ली येथील मारूती मंदिरात आगमन झाले. यावेळी प. पू. शक्ती शांतानंद महर्षी यांनी श्री मारूतीचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थितांना स्वामींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मडगावचे आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, कृषीमंत्री रवी नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, आमदार उल्हास तुयेकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माजी खा. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक, मारूती मंदिराचे भाई नायक, विश्व हिंदू परिषदेचे गोवा मंत्री मोहन आमशेकर, माजी आमदार दामू नाईक व इतरांची उपस्थिती होती.
प. पू. शक्ती शांतानंद महर्षी पुढे म्हणाले, श्री राम हे चांगले राजकारणी होते. भगवान श्रीकृष्ण सुद्धा यांनी सुद्धा राजकारण केले. त्याचे राजकारण हे धर्मयुक्त राजकारण होते. धर्मयुक्त राजनिती होती. यासाठीच आमच्या रथयात्रेमागे सुद्धा एक राजनिती आहे आणि ती धर्मयुक्त राजनिती होय.
स्वामी विवेकानंद म्हणाले होते, जर तुम्ही समाजातून धर्म काढून घेतला तर तिथे तुम्हाला अधर्म दिसेल. जर धर्म समाजातून हटविला तर समाजात कोण राहणार ? तर समाजात राक्षस-रावण राहतील व सर्वत्र राक्षसी संस्कृती निर्माण होईल. त्यासाठीच धर्मयुक्त राजनितीची आज गरज आहे.
रामराज्यच्या स्थापनेसाठी आम्ही रथयात्रा करीत आहोत. श्री रामदास मिशनच्या माध्यमांतून या रथयात्रेला 1989 प्रारंभ झालेला आहे. या रथयात्रेला 33 वर्षे झालेली आहे. दरवर्षी कर्नाटक, तामिळनाडू व केरळमध्ये रामनवमीच्या वेळी एक महिन्याची रथयात्रा सुरू असते असे ही श्री. स्वामी म्हणाले.
सुरवातीला भाई नायक यांनी सर्वाचे स्वागत केले. यावेळी मोहन आमशेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.