ऑनलाईन टीम/तरुण भारत
मातोश्रीवर जाण्याचा हट्ट आणि मुख्यमंत्र्यांविरोधात थोपटलेले दंड थोपटल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना शनिवारी सायंकाळी खार पोलिसांनी अटक केली होती. खार पोलिसांनी (Khar Police) 153 अ कलमाखाली राणा दाम्पत्याला अटक केली आहे. शनिवारची रात्र जेलमध्ये काढल्यानंतर आज राणा दाम्पत्याना पोलिसांनी वांद्रे कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वांद्रे न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी सुनावणी घेतली. हे सुट्टीचे न्यायालय असून धानीवाले हे विशेष दंडाधिकारी आहेत. अॅड. रिझवान मर्चंट यांनी राणांची बाजू मांडली. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं राणांच्या वकिलांनी सांगितलं. यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. येत्या २९ एप्रिलला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. नियमित दंडाधिकाऱ्यांचं कोर्ट कार्यरत झाल्यावर जामीनावर सुनावणी होणार आहे. पाच दिवसांनी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
दरम्यान, शनिवारी राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली होती. आज त्यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने युक्तिवादावेळी राणा दाम्पत्याच्या चौकशीसाठी ७ दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. तसेच बचाव पक्षाच्या वकिलांनी कोर्टात न्यायाधीशांना नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास विनंती केली. पण कोर्टानं तातडीने जामिनावर सुनावणी घेण्यास नकार देत २९ एप्रिल रोजी राणांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेणार असल्याचे सांगितले. यावेळी कोर्टानं रवी राणा यांची अर्थररोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी केली.
राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगितलं. यानंतर राज्यात राजकारण पेटलं आहे. मुंबईत मातोश्रीसमोर शिवसैनिकांनी दोन दिवसांपासून ठिय्या मारला होता. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीचीही शिवसैनिकांनी तोडफोड केली. यानंतर दिवसभराच्या राजकीय नाट्याचा अंत राणा दाम्पत्याच्या अटकेने झाला होता.