प्रतिनिधी/ रत्नागिरी
बोल बजरंग बली की जय! ….‘गोविंदा आला रे आला’…‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात रत्नागिरी शहरासह जिह्यातील गावागावात अनेक गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी शुक्रवारी रस्त्यावर उतरली होती. 2 वर्षांच्या कोरोना काळानंतर दहीहंडी उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि डीजे, ढोल-ताशाच्या साथीने उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला होता. दरम्यान दापोलीत एका गोपाळाच्या झालेल्या मृत्यूने या उत्सवाला गालबोट लागले आहे.
जिल्हय़ात एकूण 251 सार्वजनिक तर 2 हजार 339 खासगी दहीहंडय़ा बांधण्यात आल्या होत्या. रत्नागिरी तालुक्याते दहीहंडी फुटायला दुपारनंतर सुरुवात झाली होती. ग्रामीण भागातील अनेक गोविंदा पथकांनी शहरातील मोठय़ा पारितोषिकांच्या दहीहंडय़ा फोडण्यासाठी आपला मोर्चा शहराकडे वळवला. रत्नागिरीत चित्तथराराक मानवी मनोरे रचून हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा रंगली होती. वरूणराजाच्या अधूनमधून होणाऱया वर्षावामुळे गोविंदांना चिंब करण्यासाठी पाण्याचा वर्षाव करण्याची गरजच भासली नाही. कुठे ढोल-ताशांचा गजर, कुठे डिजेचा ताल सणाचा उत्साह वाढवत होता. रत्नागिरीत नियमांचे पालन करून मानाच्या दहीहंडय़ाना सलामी व दहीहंडय़ा फोडण्याचा आनंद मनमुराद लुटला गेला.
रत्नागिरी शहर व ग्रामीण भागात आदल्या दिवशी ठिकठिकाणी श्रीकृष्ण जन्मसोहळा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील श्री विठ्ठल मंदिरात रात्री कृष्ण जन्मसोहळय़ानंतर दुसऱया दिवशी दहीहंडीच्या दिवशी सायंकाळी 4.30वा. विठोबाचा रथ बाहेर पडतो. विठ्ठल मंदिर, गोखलेनाका, राधाकृष्ण नाका या मार्गे रथ राधाकृष्ण मंदिरात राधाकृष्णाला भेटायला जातो. पांडुरंग भेटल्याशिवाय राधाकृष्ण बाहेर पडत नाहीत. भेट झाल्यानंतर राधाकृष्ण विठोबाच्या पाठोपाठ दहीहंडय़ा फोडत येतो. राधाकृष्ण मंदिरातातील भेटीनंतर विठोबाचा रथ धनजीनाका, मच्छीमार्केट, झारणीरोड मार्गे राम मंदिर, मारूती आळीमार्गे गोखले नाक्यातून पुन्हा विठ्ठल मंदिरात येऊन उत्सवाची सांगता होते. या दरम्यान बाजारपेठेत बांधण्यात येणाऱया परंपरागत मानाच्या दहीहंडय़ा फोडून भक्तीभावात हा उत्सव साजरा झाला.
शहरासह ग्रामीण भागातही दहीहंडय़ा स्थानिक स्तरावर फोडण्यात आल्या. यावेळी विविध कार्यक्रम पार पडले. सर्वांत उंचावर चढणाऱया गोविंदाला सुरक्षा जॅकेट व हेल्मेट देण्याची सुविधा उपलब्ध होती. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांचा बंदोबस्त तैनात होता. तसेच केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा, एटीएस, शीघ्रकृती दलांचा बंदोबस्तही तैनात होता.
राजकीय गोविंदा उत्सवाचा जल्लोष
रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी महत्वांच्या नाक्यांवर राजकीय पक्ष पुरस्कृत दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. त्यात उद्योगमंत्री तथा आमदार उदय सामंत पुरस्कृत दहीहंडी उत्सवात प्रमोद महाजन क्रीडांगणात सायंकाळी उशिरापर्यंत गोविंदा पथकांच्या थरांचा जल्लोष सुरू होता. हा थरार पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय लोटला होता. आठवडा बाजार येथे राष्ट्रवादीतर्फे बांधलेल्या दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी रंगारंग मनोरंजनाचा अविष्कार व गोविंदांच्या थराराचा आनंद रसिकांनी लुटला. साळवी स्टॉप येथे जिल्हा मोटार मालक असोसिएशनची लाखमोलाची दहीहंडी हे खास आकर्षण होते. त्या ठिकाणीही मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांना घेता आला. मारूती मंदिर येथेही मानाची दहीहंडी बांधण्यात आली होती. आरोग्य मंदिर, रत्नागिरी बसस्थानकाजवळील हॉकर्स असोसिएशनची दहीहंडी फोडण्याचा जल्लोष दिसला. त्या ठिकाणीही सायंकाळपासून गोविंदा पथकांना थर रचण्यासाठी कसरत करावी लागली.
दापोलीत फुटल्या 364 दहीहंडय़ा
दापोलीः ‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर करत शुक्रवारी दापोली तालुक्यात तब्बल 364 हंडय़ा फुटल्या. यात 327 खासगी तर 37 सार्वजनिक हंडय़ांचा समावेश होता. दापोलीत यंदा सर्वच राजकीय पक्षांनी आकर्षक बक्षेसे लावून कार्यक्रमांचे आयोजित केले होते. यामध्ये शिवसेना सूर्यकांत दळवी गटाकडून 3 लाख 51 हजार, आमदार योगेश कदम गटाकडून 3 लाख 33 हजार तर माजी आमदार संजय कदम यांच्याकडून 1 लाख 11 हजार रुपयांच्या हंडीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. रात्री उशिरापर्यंत शहरात दहीहंडीचा थरार सुरू होता. यात तालुक्यातील अनेक गोविंदा पथके व नागरिकांनी हजेरी लावली होती. सकाळपासूनच सुरू असणाऱया पावसाने दहीहंडीच्या कार्यक्रमाची रंगत वाढवली होती. गोविंदाच्या थरारच्या
दापोलीत दहीहंडी पथकात नाचताना गोविंदाचा मृत्यू
तालुक्यातील पाजपंढरी येथे दहीहंडीच्या पथकात नाचताना वसंत लाया चोगले (55) या गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे.
पाजपंढरी येथेही सालाबादप्रमाणे दहीहंडीचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत होता. अनेक गोविंदा पथके यात सहभागी झाली होती. यामध्ये वसंत चोगले हे देखील मोठय़ा उत्साहात सहभागी झाले होते. मात्र नाचत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली व ते जागीच कोसळले. त्यांना त्यांच्या सहकाऱयांनी तत्काळ वैद्यकीय अधिकाऱयांकडे नेले व त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा यात दुर्दैवी मृत्यू ओढवला. त्यांच्या अचानक जाण्याने पाजपंढरी पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.