वृत्तसंस्था/ बेंगळूर
2022 रणजी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सोमवारपासून प्रारंभ होत आहे. येथे मुंबई आणि उत्तराखंड तसेच मध्यप्रदेश आणि पंजाब यांच्यात हे सामने होतील.
देशातील सर्वात जुनी म्हणून ओळखल्या जाणाऱया रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये जवळपास 22 वर्षांपूर्वी मुंबई संघाने आपले सातत्याने वर्चस्व राखले होते. मुंबई संघाने आतापर्यंत 34 वेळा रणजी करंडक पटकाविला आहे. 2000 ते 2022 या कालावधीत मुंबईचा संघ या स्पर्धेत आपल्या दर्जेदार कामगिरीमुळे अव्वल म्हणून ओळखला गेला. उत्तराखंड विरूद्ध सोमवारपासून येथे होणाऱया या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईचा संघ फेवरिट म्हणून ओळखला जातो. 2022 च्या रणजी हंगामात मुंबई संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. हे मार्गक्रमण करत असताना मुंबई संघाला विशेष परिश्रम घ्यावे लागले नाही. सौराष्ट्र संघाला त्यांच्या गटात झालेल्या गोवा संघाविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात बोनस गुणांसह विजय मिळविता न आल्याने मुंबई संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविणे अधिक सुलभ गेले. मुंबई संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉ कडे सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये नवोदित अरमन जाफर, भुपेन लालवानी, हार्दिक तमोरे हे नवे खेळाडू आहेत. जैस्वाल, सर्फराज खान तसेच मुशिर हे या संघातील महत्त्वाचे खेळाडू आहेत. अनुभवी आदित्य तरे, अष्टपैलू मुलानी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे यांची कामगिरी चांगली होणे जरूरीचे आहे.
या स्पर्धेतील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पंजाब आणि मध्यप्रदेश यांच्यात होणार आहे. पंजाब संघाची भिस्त प्रामुख्याने सलामीचा धडाकेबाज फलंदाज शुभमन गिलवर राहील. मध्यप्रदेश संघाकडे बऱयापैकी गोलंदाज आहेत. या संघामध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज कार्तिकेय सिंगचा समावेश आहे.