रंकाळा आहे तसाच जपण्याची गरज.
सुधाकर काशीद,कोल्हापूर
रंकाळा तलावावर इराणी खणीच्या काठाला एक पक्षी निरीक्षण केंद्र होते.पक्षी या परिसरात यावेत म्हणून फळवर्गीय झाडांचे रोपण करण्यात आले होते.पक्षी निरीक्षण केंद्र बांधण्यासाठी दहा-पंधरा लाख रुपये खर्च झाले होते.आताही हे केंद्र आहे.पण भकास अवस्थेत आहे.या केंद्रात पक्षी निरीक्षणासाठी कोण कधी बसल्याचे दिसले नाही.पण या केंद्राच्या टेरेसवर थाटलेल्या ओपन बारच्या निमित्ताने अनेक जण बसत असल्याचे चित्र मात्र कोल्हापूरकरांनी रोज बघितले.
आता पुन्हा बोटॅनिकल गार्डन नव्याने रंकाळा तलावावर प्रस्तावित आहे.मस्त्यालयाचाही प्रस्ताव आहे.पक्षी बघण्यासाठी गॅलरी आहे.मग आधीच्या पक्षी निरीक्षण केंद्राचा खर्च कोणाच्या माथ्यावर तर आपल्या कोल्हापूरकरांच्याच माथ्यावर!हे स्पष्ट आहे.वास्तविक सारा रंकाळा तलाव हीच पक्षी निरीक्षणाची खरी जागा आहे. कोणत्याही बाजूला जा.वेगवेगळे पक्षी आणि जलचर दिसणार हे ठरलेले आहे,मग पुन्हा नव्याने खर्च कशासाठी हा साधा सरळ प्रश्न आहे.रंकाळ्यावर जरूर गरजेनुसार पर्यटकांसाठी नव्या सुविधांची गरज आहे.पण एखाद्या लाल मातीच्या नैसर्गिक सुंदर रस्त्यावर जर बजेट खर्च करायचेच आहे म्हणून पेविंग ब्लॉक घालायचा प्रयत्न झाला तर तो थांबलाच पाहिजे.या तडजोड होऊ शकत नाही.त्यामुळे रंकाळ्यावर जरूर सोयी सुविधा झाल्या पाहिजेत.पण त्यानिमित्ताने मूळ रंकाळा जर हरवला जात असेल तर लोकांनी जागे होण्याची गरज आहे.
रंकाळ्याला शालिनी पॅलेसच्या बाजूला पांढरा घाट म्हणून संगमरवरी फरशांचा एक सुंदर घाट आहे.त्या घाटाजवळ नितळ पाणी होते.लोक घाटांच्या पायऱ्यावर बसायचे. घरातून आणलेले मळलेल्या पिठाचे बारीक तुकडे पाण्यात टाकायचे.माशांचे थवेच्या थवे पीठ खायला पाण्याच्या पहिल्या पायरीपर्यंत बिनधास्त यायचे.लाख रुपये खर्च केलेल्या मस्त्यालयात बघायला मिळणार नाही असे माशांच्या थव्याचे दर्शन व्हायचे.लोकांचे मन रमायचे.आज पांढरा घाट आहे.पण ते बोटिंगचे स्टॅन्ड झाले आहे.बोटिंग जरूर आनंदाचा एक भाग आहे.पण तेथे घाटालगत येणाऱ्या माशांच्या थव्याचा नैसर्गिक आनंद त्याखाली कधीच दडला गेला आहे.आणि हे असे का? हे कोणाला विचारणेही या क्षणी कठीण झाले आहे.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- Kolhapur: मूळ रंकाळा कसा होता रे भाऊ?
रंकाळ्याचा संध्यामठ म्हणजे एक जल वास्तु आहे.दगडी शिळावर उभ्या असलेल्या या संध्या मठाने रंकाळ्याची अनेक स्थित्यंतरे पाहिली.पण आता संध्यामठ कधीही कोसळेल अशा अवस्थेत आहे.रंकाळा सुशोभीकरणात त्याचा समावेश नाही.पण रंकाळ्यावर नव्या आठ कमानी उभा राहणार आहेत.चार ठिकाणी टॉयलेट बाथरूम असणार आहे.विस्तीर्ण असे पार्किंग होणार आहे.रंकाळ्याचे मूळ सौंदर्य संध्या मठासारख्या दगडी वास्तुनी सजले आहे.पण संध्यामठ मात्र अखेरच्या घटका मोजत आहे.
रंकाळ्याच्या मुख्य घाटावर लोखंडी जाळी आहे आजही आहे.या जाळीखाली रंकाळ्याचे पाणी सोडण्याची यंत्रणा आहे.रंकाळा टॉवर म्हणजे वॉल्टर डकेट या ब्रिटिश अभियंत्याची सौंदर्यशील शिल्प निशाणी आहे.पण सध्या या भागात गळती आहे.गवत, झाडे, झुडपे, रान अळूचे सर्वत्र साम्राज्य आहे.रंकाळा ओव्हर फ्लो झाला की पाणी त्या बाजूने बाहेर पडण्याचा तो मार्ग झाला आहे.
रंकाळ्याचा परताळा हा एक अतिशय महत्त्वाचा संवेदनशील भाग आहे.रोज,होय रोजच या परताळ्याच्या कडेला खरमाती आणून ओतली जात आहे.खर माती ओतायची.जागा सपाट करायची व एका रात्रीत तेथे केबिन उभी करायची अशी एक छुपी स्टाईल कोल्हापुरात आहे.ती स्टाईल या परताळ्यात राबवली गेली तर ते नवल नसणार आहे.त्यामुळे रंकाळा हे कोल्हापूरचे वैभव आहे.पर्यावरणाचे महत्त्वाचे स्थान आहे.एखाद्या शहरालगत नव्हे आता शहरातच इतका मोठा तलाव आहे आपले कोल्हापूरकरांचे भाग्य आहे.त्याचे जतन संवर्धन करण्यासाठी खर्च झाला पाहिजे हे खरेही आहे.पण रंकाळ्याचे मूळ अस्तित्व टिकूनच संवर्धन जरुरीचे आहे.रंकाळा सुंदरच आहे.त्यामुळे त्याला चालू असलेला मेकअप अनावश्यक आहे.मूळ संवर्धनावर खर्च आवश्यकच आहे.कारण रंकाळा टिकला तरच पुढचे सारे काही आहे.