अमृतमहोत्सवदिनी तालुका पंचायत माजी सदस्य रावजी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव : अनेक मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
घराण्याला कोणताही राजकीय वारसा नाही, मात्र केवळ सत्यशोधक चळवळीतून माणूस किती मोठा होऊ शकतो, तो चळवळ कशी उभी करू शकतो, हे येळ्ळूरचे सुपुत्र, तालुका पंचायत माजी सदस्य रावजी पाटील यांनी दाखवून दिले आहे. रावजी पाटील म्हणजे बेळगावच्या चळवळीचा आत्मा असून त्यांनी समाजासाठी, सीमाप्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी दिलेले योगदान कधीच विसरण्याजोगे नाही. अशा या चळवळी करणाऱ्या कार्यकर्त्याचा आदर्श इतरांनी घेणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांच्यावर अमृतमहोत्सव दिनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
मराठा मंदिर येथे रावजी पाटील यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. रावजी पाटील यांनी शेतकरी, सीमाप्रश्न, कुस्ती आखाडा, सहकार क्षेत्र आणि शिक्षणाची जी चळवळ केली ती वाखाणण्याजोगी आहे. कार्यकर्ता कसा घडतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे प्रमुख वक्ते निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी सांगितले.
शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन आपल्या कुटुंबाला सुसंस्कृत, संस्कारक्षम आणि उच्चशिक्षित बनविण्यात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. केवळ स्वत:चे कुटुंबच नाही तर समाजासाठीही आपण काही तरी केले पाहिजे, हेदेखील त्यांनी दाखवून दिले आहे. शाहू, फुले आणि गांधीवादी चळवळीचा वसा घेऊन प्रामाणिकपणे म. ए. समितीशी एकनिष्ठ राहून त्यांनी तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आज 75 वर्षे झाली तरी त्यांची काम करण्याची उर्मी खरोखरच कौतुकास्पद असल्याचे अ. भा. मराठा महासंघ कोल्हापूरचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले.
कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, रावजी पाटील हे आमचे नातेवाईक आहेत. त्यामुळे मी त्यांच्या कार्यक्रमाला आले आहे. येथील जनतेचे त्यांच्यावरील प्रेम पाहून मी भारावून गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्य करण्याची पद्धत सर्वांनाच आदर्शवत
शाहू महाराजांनी कोल्हापूरच नाही तर धारवाड, रायबाग या ठिकाणीही चळवळ सुरू केली होती. जात, धर्म, भाषा भेद कधीच त्यांनी दाखवून दिले नाही. मात्र, येथील मराठी भाषिकांवर भाषेवरून भेदभाव केला जात आहे, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार म्हणाले, कोणत्याही कार्याचा पहिला घाव महत्त्वाचा असतो. तो रावजी पाटील यांनी कारखाना उभारताना घातला होता. रावजी पाटील यांचे वागणे, बोलणे आणि कार्य करण्याची पद्धत सर्वांनाच आदर्शवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीमाप्रश्नाच्या चळवळीमध्ये भाग
मंडल पंचायतवर बिनविरोध निवडून येणे, त्यानंतर पंचायत प्रधान होणे आणि सीमाप्रश्नासाठी लढा देणे कौतुकास्पद आहे. अत्यंत निष्ठेने त्यांनी सीमाप्रश्नाच्या चळवळीमध्ये भाग घेतला. चढ-उतार जीवनामध्ये येतात. त्यावर मात करत त्यांनी केलेले कार्य महत्त्वाचे असल्याचे मत माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांची मुलगी प्रा. छाया म्हणाल्या, आमच्याकडे पैसा कमी होता, मात्र आमच्या वडिलांनी आम्हाला काहीच कमी पडू दिले नाही. आज माझी दोन भावंडे उच्चशिक्षित आहेत, ते केवळ वडील व आई यांच्या कष्टामुळे. वडिलांच्या संस्कारांवरच आम्ही आज उभे आहोत. माझा एक भाऊ डॉ. महादेव हा एमडी, डीएनबी करून ऑस्ट्रेलियात मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत आहे. दुसरा भाऊ संदीप बीईनंतर हिंडाल्कोमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे.
प्रारंभी महाराष्ट्रगीत म्हणण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल हुंदरे यांनी केले. दत्ता उघाडे यांनी आभार मानले. व्यासपीठावर माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, मराठा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, निवृत्त शिक्षक दाजिबा पाटील, राजेंद्र मुतगेकर उपस्थित होते.
यावेळी मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार व संचालक मंडळ, समाज शिक्षण मंडळ येळ्ळूरच्या अध्यक्षा लीलाताई मेणसे, माजी आमदार दिगंबर पाटील, भाजप नेते किरण जाधव, राजू सेठ, माजी आमदार एस. सी. माळगी, मराठा समाज सेवा मंडळ वडगावचे संचालक, येळ्ळूर विभाग म. ए. समिती अध्यक्ष शांताराम कुगजी व सदस्य, येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील व सदस्य, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, नवहिंद युवक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, नवहिंद प्रबोधिनी मंडळाच्या सदस्या, प्रियदर्शिनी नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीच्या चेअरमन व संचालक, न्यू नवहिंद मल्टिपर्पजचे चेअरमन व संचालक, नवनिर्माण मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन व संचालक, येळ्ळूर कुस्ती आखाडा समिती महाराष्ट्र मैदानचे सदस्य, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोज पावशे, नीलिमा पावशे, येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ अध्यक्ष व सदस्य, नेताजी को-
ऑप. सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील व संचालक, ता. पं. माजी सदस्य सुनील अष्टेकर, पीकेपीएसचे चेअरमन दीपक कार्लेकर व संचालक, शिवाजी विद्यालयाचे शिक्षक, येळ्ळूर डॉक्टर संघटना, बेळगाव जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाचे चेअरमन आर. बी. बांडगी व संचालक, चांगळेश्वरी विश्वस्त मंडळ, तालुका म. ए. युवा आघाडीचे पदाधिकारी, हिंदवी स्वराज्य युवक संघटना, आर. एम. चौगुले यांच्यासह सहकार, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.