बलात्काराच्या घटनांवर ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधानांना पत्र
वृत्तसंस्था/कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बलात्काराच्या घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. पत्रात ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांकडे बलात्काराच्या घटनांच्या सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट (जलदगती न्यायालय) तयार करण्याची मागणी केली आहे. यासोबतच देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून अनेक प्रकरणांमध्ये बलात्कारासोबतच खूनही केला जातो याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
9 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमधील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी कोलकाता पोलिसांनी एका स्वयंसेवकाला अटक केली होती. त्याचवेळी 13 ऑगस्ट रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने 14 ऑगस्टपासून तपास सुरू केला असून आता याप्रकरणी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून काही महत्त्वाचे मुद्दे कळवले आहेत.
कठोर शिक्षेची तरतूद असावी : ममता बॅनर्जी
देशभरात दररोज सुमारे 90 बलात्काराच्या घटना घडतात हे पाहणे भयावह आहे. त्यामुळे समाज आणि राष्ट्राचा आत्मविश्वास आणि विवेक डळमळीत होतो. महिलांना सुरक्षिततेसाठी अशा कृती संपवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींविऊद्ध कठोर शिक्षेची तरतूद व्हायला हवी. कडक कायद्याद्वारे अशा गंभीर आणि संवेदनशील समस्येकडे सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज आहे, असे म्हणणेही ममता बॅनर्जी यांनी पत्रात मांडले आहे. बलात्काराच्या प्रकरणांमध्ये जलद न्याय मिळण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये जलदगती विशेष न्यायालये स्थापन करण्याचाही विचार प्रस्तावित कायद्यात केला पाहिजे. अशा प्रकरणांची सुनावणी शक्मयतो 15 दिवसांच्या आत पूर्ण करावी, अशी अपेक्षाही ममता बॅनर्जींनी व्यक्त केली.