ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात ऐतिहासिक वास्तू, मंदिर-मशीद यावरून वाद सुरु असताना आता हैदराबादच्या चारमिनारबाबतही वाद निर्माण झाला आहे. तेलंगणा काँग्रेसचे नेते रशीद खान (congress leader rashid khan) यांनी चारमीनारमध्ये (Charminar) नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. ते म्हणाले, ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून संरक्षित आहे. यापूर्वी चार मिनारमध्ये नमाज अदा केली जात होती. मात्र, सुमारे दोन दशकांपूर्वी लोकांना येथे नमाज अदा करण्यापासून रोखण्यात आले होते. परंतु आता पुन्हा नमाज पठण करण्याची परवानगी मिळावी यासाठी काँग्रेस नेते स्वाक्षरी मोहीम राबवित आहेत.
त्याच वेळी मौलाना अली कादरी यांनी एएनआयला सांगितले की, पूर्वी लोक चार मिनारमध्ये नमाज अदा करत असत, परंतु येथे एका व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आली.
मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करणार
तेलंगणा काँग्रेसचे नेते रशीद खान म्हणाले, “आम्ही सांस्कृतिक मंत्रालय आणि एएसआयकडे मागणी करतो की चार मिनारमध्ये पुन्हा नमाज अदा करण्यास परवानगी द्यावी.” अन्यथा मागणी मान्य न झाल्यास सर्वांच्या सह्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. असे असतानाही नमाज अदा करण्यास परवानगी न मिळाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला आहे.
भाग्य लक्ष्मी मंदिराचे बांधकाम अवैध
राशिद खान यांनी ASI अहवालाचा हवाला देऊन चार मिनारजवळील असणारे भाग्य लक्ष्मी मंदिराचे बांधकाम बेकायदेशी आहे. आम्ही गंगा,जमुना तहजीबवर विश्वास ठेवतो. मंदिरात प्रार्थना होत असेल तर होऊ द्या, पण ज्या प्रकारे आमची मशीद बंद आहे, ती उघडून आम्हाला नमाज पढायला दिली पाहिजे. खान म्हणाले, जर एएसआय मशीद बंद करत असल तर मंदिर देखील बंद केले पाहिजे.
जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
दुसरीकडे भाजपने काँग्रेस नेत्याची मागणी ही जातीय तेढ निर्माण करणारी असल्याचे म्हटले आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार म्हणाले, काँग्रेसने आपले स्थान गमावले आहे. ते आता जातीय मुद्दे उपस्थित करून जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. चार मिनार आणि मंदिर या दोन मुद्द्यांना जोडणे हा जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे.