भक्तीरसामृत स्वामींची माहिती : उत्सवाची तयारी पूर्ण : दोन दिवस भरगच्च कार्यक्रम
बेळगाव : सालाबादप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत म्हणजेच इस्कॉनतर्फे 26 वा रथयात्रा महोत्सव दि. 10 व 11 फेब्रुवारी रोजी भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात दीड लाखांहून अधिक भाविक सहभागी होतील. बेळगावकरांनी महोत्सवात सहभागी होऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी केले. महोत्सवाची माहिती देण्यासाठी बुधवारी सकाळी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सध्या देशभरात धार्मिक जागरण होत आहे, ही आध्यात्मिक क्रांतीच आहे. अशी क्रांती तलवार, बंदूक किंवा गोळ्यांनी होत नाही तर ती ज्ञान आणि भक्तीच्या मार्गाने होते. हृदयपरिवर्तन होऊन जसे दुर्गुण आणि नकारात्मक भावनांचे शमन होते, हेच धर्माचे मुख्य उद्दिष्ट आहे. आर्थिक आणि भौतिकदृष्ट्या परिवर्तन होण्यापेक्षाही आध्यात्मिक परिवर्तन होणे आवश्यक आहे. आपण आत्म्याच्या प्रगतीसाठी कार्य केले तरच व्यक्ती आणि समाजाचे सकारात्मक परिवर्तन होते. रथयात्रेचा उद्देश पैसा किंवा प्रदर्शन हा नाही, तर आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणे हा आहे. या रथयात्रेला स्थानिक आणि परगावच्या नागरिकांबरोबरच परदेशातील भाविकही उपस्थित राहणार आहेत. रथयात्रेचा संपूर्ण मार्ग रांगोळ्या आणि फुलांनी सजविला जाईल. या मार्गावर भाविक कृष्णभक्तीत तल्लीन होऊन गेलेले पाहायला मिळतील. यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक येणार आहेत.
रथयात्रेंतर्गत सजविलेली बैलगाडी तसेच अन्य वाहने असतील. रथयात्रा पाहण्यास उपस्थित असलेल्या लोकांना प्रसाद म्हणून 50 हजारहून अधिक पाकिटे तयार करण्यात आली आहेत. याशिवाय विविध रंगांचे ध्वजही रथयात्रेत पाहायला मिळतील. रथयात्रा इस्कॉनच्या मुख्य मंदिरात आल्यानंतर तेथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी भजन, कीर्तन, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच व्याख्याने होतील, अशी माहिती त्यांनी दिली. इस्कॉनतर्फे शाळा-महाविद्यालयांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, ताण व्यवस्थापन, मनाचे संयमन याबद्दल मार्गदर्शन केले जाते. दर महिन्याला ‘फूड फॉर लाईफ’ अंतर्गत हजारो जणांना भोजन दिले जाते. कोविड काळात इस्कॉनने नागरिक आणि पोलीस प्रशासनाला भोजन व्यवस्था पुरविली आहे. इस्कॉन रथयात्रा काळात प्रसाद म्हणून पूर्ण भोजनच देतात. यासाठी स्वेच्छेने इस्कॉनभक्त कार्यरत आहेत. उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. इस्कॉनमध्ये जीवनाचा मूळ हेतू काय आहे? हे जाणून घेता येते. आजच्या गोंधळलेल्या वातावरणात आध्यात्मिक विचारच आपल्याला तारून नेतील, असे महोत्सव समितीचे अध्यक्ष एच. डी. काटवा यांनी सांगितले. प्रारंभी श्रीपालकृष्ण भट्टड यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी रथयात्रा महोत्सवाचे समन्वयक रामदास, नागेंद्र, मदन गोविंद, संकर्षण, गौरांग प्रसाद, निताई निमाई, महादेव पुरी, अमृतकृष्णा, वादन्यचैतन्य, श्वेतनिताई, रामायण आणि परंपरा दास आदी उपस्थित होते.
रथयात्रेचा मार्ग
शनिवार दि. 10 रोजी दुपारी 12.45 वाजता सर्व भक्तगण धर्मवीर संभाजी चौक येथे जमतील. 1.30 वाजता आरती होऊन मिरवणुकीला प्रारंभ होईल. रथयात्रा धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड, पाटील गल्ली, कपिलेश्वर रोड, एसपीएम रोड, खडेबाजार-शहापूर, नाथ पै सर्कल, बीएमके आयुर्वेदिक कॉलेज ते गोवावेसमार्गे मंदिरात येईल.