जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल : नोटीस बजावूनही सुधारणा होत नसेल तर ठेका करणार रद्द – सीईओ इंदुराणी जाखड
प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरीतील शालेय पोषण आहार वाटपातील गोंधळ व काही शाळांमध्ये नित्कृष्ठ दर्जाचा होणाऱ्या विद्यार्थ्यांना आहाराच्या पुरवठ्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या साऱ्या प्रकाराबाबत
जिल्हा प्रशासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराला तातडीने दोन नोटीसा बजावण्यात आल्या असून 3 नोटीस दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील शाळांमध्ये सेंट्रल किचन पध्दतीने पोषण आहार पुरवठ्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार 1 ऑगस्ट रोजी येथील शिर्के प्रशाला, त्यानंतर तिसऱ्या दिवशी दामले हायस्कूलमध्ये पोषण आहारात नियमितता आढळून आली. इतकेच नव्हे तर अर्धवट शिजलेला पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला होता. पोषण आहाराचा दर्जाही व्यवस्थित नसल्याची बाब प्रकर्षाने समोर आली. पाण्यासारखी आमटी व चिकट स्वरूपाचा भात विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला. या घडल्या प्रकाराबाबत शाळांकडूनही तक्रारी अहवाल मागवण्यात आला या आहार पुरवठ्याबाबत संबंधित ठेकेदार संस्कार महिला बचतगट, कोल्हापूर या संस्थेला नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावूनही सुधारणा होत नसेल तर 3 नोटीसानंतर ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सीईओ डाॅ.इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.