पावसाचा जोर ओसरल्याने थांबलेली कामे युध्दपातळीवर सुरू, चिपळूण टप्प्यातील 400 मीटरच्या संरक्षक भिंतीचे कामही पूर्णत्वास
प्रतिनिधी/चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात पावसाळ्यामुळे थांबलेले चौपदरीकरणाचे काम आता पावसाचा जोर कमी होताच युध्दपातळीवर सुरू झाले आहे. यामध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या डोंगर खोदाईलाही सुरूवात झाली असून सवतसडा धबधब्यापासून डोंगराच्या बाजूने उभारण्यात येत असलेल्या चारशे मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचे कामही पूर्णत्वास गेले आहे.
महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशुराम घाट हा अत्यंत अवघड टप्पा आहे. एकीकडे 22 मिटर उंच डोंगर उतार आाणि दुसरीकडे घाटाच्या पायथ्याशी पेढे गाव असल्याने येथे डोंगर खोदाईसह अन्य कामे करणे अवघड बनले आहे. तरीदेखील हे आव्हान स्वीकारण्यात आले आहे. उन्हाळ्यात डोंगर खोदाई करताना पोकलेन दरडीखाली सापडून चालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर खबरदारी घेऊन काम सुरू ठेवण्यात आले. सर्वप्रथम पायथ्या लगतच्या गावास सुरक्षित करण्यासाठी उताराच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्यात आली. त्यामुळे यावर्षी आतीवृष्टी होऊनही बौद्धवाडी येथील एका घरावर दगड येऊन नुकसान वगळता पेढे गावाला धोका पोहोचला नाही.
पावसाळ्याच्या सुरूवातीला माथ्यावर वसलेल्या परशुराम गावातील डोंगराला भेगा गेल्याने काहीकाळ वाहतुकीसाठी घाट बंद ठेवण्यात आला. त्यानंतर तो अवजड वाहनांसाठी व गेल्या महिन्यात सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. घाटातील डोंगर खोदाई आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न यावरून मध्यंतरी मोठा वाद निर्माण झाला होता.
चिपळूण टप्प्यात घाटातील पेढेकडील बाजूने पावणेदोन कि. मी.चा भाग असल्याने डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सवतसडा येथे कठीण खडक तोडल्यानंतर तेथून या संरक्षक भिंतीच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. सध्या 400 मीटर लांब व सुमारे दहा मीटर उंच संरक्षक भिंतीचे काम पूर्णत्वास गेलो आहे. या भिंतीमुळे डोंगराच्या खालील रस्ता वाहतुकीचा धोका कमी झाला आहे.
पावसाळ्यात थांबलेली डोंगराची खोदाईही पुनश्च सुरू करण्यात आली आहे. सुरक्षिततेचे नियम अंमलात आणून त्यादृष्टीने कामे युध्दपातळीवर सुरू आहेत.