जिल्ह्याला पुढील 4 दिवस पावसाचा ‘रेड अलर्ट’; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कोकणासह जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. राजापुरात अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आला असून अर्जुना प्रकल्पाचा उजवा कालवा फुटल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. वाशिष्ठी व शिवनदीची पाणीपातळी वाढल्याने चिपळूण नगर परिषद पशासन अलर्ट झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथे पुराच्या पाण्यात बस अडकून पडल्याची घटना घडल़ी. लांजा, संगमेश्वरातही मुसळधार पावासाने दाणादाण उडवली.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्या इशारा पातळी ओलांडून तर काही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने जनजीवन प्रभावीत झाले आहे. त्यात हवामान विभागाने 8 जुलैपर्यंत रत्नागिरीसह, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण कोकण किनारपट्टी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या प्रभावाखाली आली आहे. त्यामुळे सर्वत्र पावसाचे धुमशान सुरू आहे. रविवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणात नैसर्गिक आपत्तींत वाढ होत आहे. अनेक मोठ्या नद्यांच्या पाणीपातळीने मर्यादा रेषा ओलांडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूरस्थितीत वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी झालेल्या काही तालुक्यातील अतिमुसळधार पावसाने ही पूरस्थिती प्रकर्षाने दिसली. त्यात खेड, चिपळूण, राजापूर तालुक्यांचा समावेश होता. जिल्ह्यात काही ठिकाणी या पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे दरडग्रस्त ठिकाणच्या रहिवासी नागरिकांना सतर्क राहून त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतराच्या सूचना प्रशासनस्तरावरून करण्यात आल्या आहेत.