रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून खातेदारांना मोठा फटका; 2 लाख 28,548 खातेदारांची झाली आर्थिक कोंडी
रत्नागिरी प्रतिनिधी
भारतीय टपाल खात्याचे देशभरातील सर्व्हर डाऊन झाल्याच्या प्रकाराने रत्नागिरीतीलही टपाल खात्यांच्या ऑनलाईन व्यवहारांना मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील टपाल खात्याशी संलग्न असलेले सुमारे 2 लाख 28 हजार 548 खातेदार त्यामुळे आर्थिक विवंचनेत पडले. गेले 2 दिवस सर्व्हर डाऊन झाल्यानंतर टपाल कार्यालयात आर्थिक व्यवहार करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाती परतण्याची वेळ आली.
टपाल खात्याच्या सर्व्हरचे तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे सर्व्हर डाऊन झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले. या तांत्रिक बिघाडाचा परिणाम गेले तीन दिवस सोमवार, मंगळवार, बुधवारी देखील व्यवहार पूर्णत: ठप्प झाले होते. त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील 2 लाख 28,548 खातेदारांना सहन करावा लागला. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्राहकांना कोणतेच व्यवहार करता न आल्याने मोठी अडचण निर्माण झाली. टपाल खात्यामार्पत आर्थिक व्यवहार करणाऱ्या वयोवृद्ध ग्राहकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
सर्व्हर डाऊन झाल्याने जिल्ह्यातील सर्व प्रमुख टपाल कार्यालयांतील कामकाज सुमारे सोमवारपासून ठप्प झाले. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. रत्नागिरी जिल्ह्यात 2 मुख्य टपाल कार्यालयासह 77 उप डाकघर व 584 शाखा कार्यालयाच्या माध्यमातून 8 लाख 61 हजार 598 खातेदार आहेत. तसेच 2 लाख 28 हजार 548 राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची खाती आहेत. कार्यालयांमधून बचत खात्यात पैसे भरणे, काढणे, सेवानिवृत्ती वेतन अदा करणे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, आरडी, एमआयएस, पीपीएफ आदी कामे केली जातात. रजिस्टर किंवा पार्सलची कामे केवळ ऑफलाईन केली जातात. तर यापैकी बहुतेक कामे ऑनलाईन चालणारी आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून टपाल खात्याला सर्व्हर डाऊन असल्याची समस्या वारंवार भेडसावत आहे. अधूनमधून सर्व्हरची गती मंदावण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे नागरिकांना टपाल कार्यालयात गेल्यावर नाहक रांगेत तिष्ठत राहण्याची वेळ येते. गेल्या सोमवारी सकाळी आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर सर्व्हर डाऊन असल्याचे कर्मचाऱ्यांच्या बाब निदर्शनास आली. त्या बाबतची तक्रार राज्यस्तरावर कळवण्यात आली. त्यावेळी टपाल विभागाचे देशातीलच सर्व्हर डाऊन असल्याची बाब पुढे आली आहे. सोमवारी सायंकाळी सर्व्हर पूर्ववत होईल, अशी शक्यता होती. पण मंगळवारीही सलग दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन राहिल्याचा परिणाम टपाल खात्याशी निगडित सर्व व्यवहार ठप्प झाले होते. सर्व्हर डाऊनबाबत अधिकृत स्पष्टीकरण टपाल खात्याकडून न मिळाल्याने खातेदारही बुचकाळ्यात पडले आहेत. बुधवारीही या तांत्रिक अडचणींचा सामना खातेदारांना करावा लागला. त्यामुळे सर्व्हर पूर्ववत होऊन ऑनलाईन व्यवहार सुरळीत होण्याची खातेदारांना प्रतीक्षा लागून राहिली होती.
आज काय सर्व्हर डाऊन…उद्या काय, दुसरेच कारण…एखाद्याकडे तेवढेच पैसे असतील तर त्याने उपाशी राहचेय काय? आमची गरज असताना आमचे पैसे मिळत नसतील तर आम्ही काय करायचं?…काय ती लवकर अडचण सोडवा. अशी मागणी अनिता कळंबटे, या शेतकरी महिला, महिलेने केली आहे.