पोतदार इंटरनॅशनल स्कूल द्वितीय, तर नवनिर्माण हायस्कूलला तृतीय क्रमांक
प्रतिनिधी/रत्नागिरी
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप.सोसायटी लि. रत्नागिरी विभाग आयोजित वंदे मातरम् समूहगीत गायन स्पर्धा दिनांक 20 ऑगस्ट रोजी रत्नागिरी शहरातील शेरेनाका येथे राणी लक्ष्मीबाई सभागृहात पार पडली. या स्पर्धेसाठी जवळपास 10 शाळांमधील संघांनी सहभाग नोंदवला होता. ज्यात श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय फणसोप, पोतदार इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, श्री स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस, श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडीयम स्कूल, गोदूताई जांभेकर विद्यालय, माने इंटरनॅशनल स्कूल, देसाई हायस्कूल, फाटक हायस्कूल, नवनिर्माण हायस्कूल या शाळेच्या संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी 6 मिनिटांचा अवधी होता शिवाय या स्पर्धेत प्रत्येक शाळेच्या संघांनी विविध वाद्यांचा समावेश करून आपल समूहगीत खुलवण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय ,तृतीय असे क्रमांक काढण्यात आले तर उर्वरित शाळांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक हा श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडियम स्कूल(जीजीपीएस) संघाला, द्वितीय क्रमांक हा पोतदार इंटरनॅशनल स्कूल संघाला तर तृतीय क्रमांक हा नवनिर्माण हायस्कूल संघाला प्राप्त झाला. या स्पर्धेत पहिले तीन क्रमांक प्राप्त शाळांनी क्रमश: देश मेरा भारती (जीजीपीएस), सारे जहाँ से अच्छा(पोतदार इंटरनॅशनल स्कूल), करेंगे भारत निर्माण(नवनिर्माण हायस्कूल) अशी देशभक्तीपर गीते सादर केली.
या स्पर्धेचे परीक्षण संगीत शिक्षिका व गायिका विनया परब तसेच संगीत शिक्षिका व गायिका संध्या सुर्वे, आकाशवाणीचे ए ग्रेड कलाकार अवधूत बाम, ज्येष्ठ गायक नरेंद्र रानडे यांनी केले.
या वेळी क्रमांक प्राप्त व प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त शालेय संघाना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ.शरद प्रभूदेसाई, लोकमान्यचे जनसंपर्क अधिकारी राजू नाईक, बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड दिलीप धारिया तसेच निवृत्त तहसीलदार विजय दांडेकर लोकामन्य संस्थेचे हितचिंतक व सदस्य हेमंत आपटे व लोकमान्य रत्नागिरी, कुंवारबाव, सावरकर रोड आणि पावस शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सहभाग घेतलेल्या शालेय संघाचे व बक्षीस प्राप्त संघांचे कौतुक केले व त्यांच्या भविष्यच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकामान्यचे राजेश घोलकर व आभारप्रदर्शन अंजली कुलकर्णी यांनी केले होते.
वंदे मातरम् व गणरंग स्पर्धा आता दरवर्षी होणार
या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादामुळे लोकमान्यतर्फे वंदे मातरम समूहगीतय गायन स्पर्धा आता दरवर्षी घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच येत्या गणेशोत्सवात गणरंग नावाची चित्रकला स्पर्धा देखिल आयोजित करणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही स्पर्धा आता दरवर्षी घेतल्या जाणार आहेत.