दापोली प्रतिनिधी
या वर्षभरात झालेल्या प्रचंड इंधन दरवाढीमुळे वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन संक्रांतीच्या वस्तूंची किंमतदेखील वाढली आहे. यामुळे यंदाची संक्रांत थोडी कडू झाली असून नात्यातील ‘गोडव्यात’ थोडी घट होणार आहे.
संक्रांतीला तिळगुळाला महत्व
भारतीय संस्कृतीमध्ये संक्रांतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संक्रांतीला घरोघर तिळगुळ बनवण्यात येतो व नात्यातील गोडवा जपण्यासाठी वाटण्यात येतो. आपल्या माणसामधील गोडवा वाढवण्यासाठी सर्वजण यादिवशी प्रयत्न करत असतात. यामुळे या दिवसांमध्ये तिळगुळाची मोठय़ाप्रमाणात उलाढाल होते.
इंधन दरवाढीने सर्व महागले
मात्र वर्षभरात झालेल्या इंधन दरवाढीचा फटका रस्ता वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे सर्वच वस्तूंबरोबर तिळगुळदेखील महागला आहे. गेल्यावर्षी साधारण 100 रुपये किलो मिळणारा शेंगदाणा यंदा 140 रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे, तर गुळाची किंमत 40 रुपयांवरून 60 रुपयावर जाऊन पोहोचली आहे. तसेच तिळगुळासाठी लागणारा व गुजरातवरून येणारा तीळ हा 150 रुपयावरून 200 रुपयावर जाऊन पोहोचला आहे. गेल्यावर्षी कमर्शियल गॅस सिलेंडर मिळत होता त्याच दरात आता घरगुती गॅस सिलेंडर मिळत आहे. याचा परिणाम तिळगुळाच्या दरावर झालेला आहे. यामुळे यंदा तिळगुळ जवळजवळ 400 रुपये किलोने विकला जात आहे.
व्हाट्सऍपमुळे गोडवा दुरूनच
ज्यावेळी व्हाट्सऍपचा जमाना नव्हता त्यावेळी आपल्या घरात बनवलेला तिळगुळ प्रत्यक्ष आपल्या नातेवाईकांच्या मित्रांच्या घरी जाऊन देण्याची पद्धत होती. आता व्हाट्सऍपचा जमाना आल्यामुळे संक्रांतीच्या दिवशी सकाळपासून मित्रमंडळींना आप्तस्वकियांना व्हाट्सऍपवर तिळगुळाचे वेगवेगळ्याप्रकारचे फोटो पाठवण्याची चुकीची पद्धत रूढ झाली आहे. यामुळे प्रत्यक्ष जाऊन तिळगुळ देण्याच्या प्रकारात घट झाली असल्याचे दिसून येत आहे. याचा फटकादेखील काहीप्रमाणात तिळगुळाच्या मागणीला बसला असल्याचे बोलले जात आहे.
तरी मागणी कायम- पेठे
याबाबत बोलताना दापोलीतील व्यापारी युवराज पेठे यांनी मात्र आपल्याकडील तिळगुळाच्या मागणीवर यंदा फार मोठा परिणाम झालेला नसल्याचे सांगितले. शिवाय तिळगुळ बनवणाऱया कामगारांची मजुरी व कच्च्या वस्तूंच्या किमतीमध्ये जरी भाववाढ झाली असली तरी आपल्याकडील मागणीत अद्याप फार मोठी घट झालेली नसल्याची युवराज पेठे यांनी ‘तरुण भारत’ची बोलताना सांगितले.
खर्चात झाली वाढ- परांजपे
त्याचप्रमाणे कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती व कोरोनानंतर मजुरीमध्ये झालेली 25 टक्के वाढ तिळगुळाच्या किमतीस कारणीभूत असल्याचे येथील तिळगुळ विक्रेते प्रशांत परांजपे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. शिवाय सध्या सोशल मिडियाचा जमाना असल्यामुळे घरोघर तिळगुळ बनवून त्याची सोशल मिडियावर व्हाट्सअपद्वारे विनामूल्य जाहिरात करून आमच्याकडे घरगुती तिळगुळ मिळतो अशाप्रकारची जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा परिणाम रितसर परवाना घेऊन कमर्शियल वीज मीटरचा वापर करून शिवाय व्यावसायिक सिलेंडर वापरणाऱया दुकानदारांना याचा फटका बसत आहे. ज्यांच्याकडे कोणताही परवाना नाही, ज्यांना कोणतीही वस्तू कमर्शियल दराने विकत घ्यावी लागत नाही ते कमर्शियल वस्तू वापरणाऱया दुकानदारांच्या दरातच तिळगुळ विकत आहेत. याचा फटकादेखील बसल्याचे प्रशांत परांजपे यांनी सांगितले.