गुहागरातील खोडदे पुलाखाली सापडला मृतदेह, तिघे संशयित ताब्यात; रत्नागिरीत लागोपाठ घडणाऱ्या घटनांनी खळबळ, पोलिसांची धावपळ
रत्नागिरी / प्रतिनिधी
एकीकडे रत्नागिरी शहर परिसरात नागरिकांना लुटणारी टोळी कार्यरत असतानाच रत्नागिरीच्या बाजारपेठेतून ठाणे येथून सोने-चांदीच्या व्यापारासाठी आलेल्या किर्तीकुमार कोठारी या व्यापाऱ्याचे अचानक गायब होण्याने मोठी खळबळ उडाली होती. सोमवारी रात्री घडलेल्या घटनेची शहर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तकार नोंदण्यात आली. या प्रकरणात घातपाताचा दाट संशय व्यक्त होत होता, पण व्यापाऱ्याचा गोणपाटात भरलेला मृतदेह बुधवारी सायंकाळी रत्नागिरी-आबलोली-गुहागर मार्गावरील खोडदे पुलाखाली सापडल्याने घातपातावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी तिघा संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. सोने-चांदीच्या व्यवहारातूनच एका व्यापाऱ्यानेच कोठारी याचा काटा काढल्याची जोरदार चर्चा रत्नागिरीत सुरू आहे. ठाणे येथील प्रसिद्ध सोने-चांदी व्यापारी किर्तीकुमार अजयराज कोठारी (55, भाईंदर पश्चिम) रत्नागिरीत आपला सोने-चांदीचा माल विक्रीसाठी येत असत. 18 सप्टेंबरच्या रात्री ते भाईंदर येथून रत्नागिरीला आले. आठवडा बाजार येथील श्रध्दा लॉजमध्ये ते उतरले होते. सोमवारी रात्री 8.15 वाजल्यापासून ते गायब झाल्याची बाब समोर आली. सोमवारी रात्रीनंतर नातेवाईकांचा त्यांच्याशी संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला व मंगळवारी थेट रत्नागिरी गाठली. त्यांचा मुलगा करण यांनी शहर पोलिसात खबर दिली. पोलिसांनी बेपत्ता खबर दाखल करून तातडीने किर्तीकुमार कोठारींचा शोध सुरू केला. किर्तीकुमार यांचे नातेवाईकही त्यांचा शोध घेत होते. या शोधमोहिमेत रत्नागिरी बाजारपेठेत एम. जी. रोडवरील एका ज्वेलर्सकडून राधाकृष्ण नाक्यापर्यंत ते चालत आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे. मात्र त्यानंतर त्यांचा पुढील माग काढण्यात अडचण आल्याने बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलीस यंत्रणेमार्फत हाती घेण्यात आले. त्यांच्याजवळ सुमारे 10 ते 12 लाखांचे दागिने असल्याची चर्चा आहे. रत्नागिरीत त्यांनी काही दागिन्यांच्या व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. या दरम्यान ते राधाकृष्ण नाका येथून बेपत्ता झाले. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, किर्तीकुमार श्रध्दा लॉजमध्ये सोमवारपासून परतले नव्हते. लॉजच्या खोलीत फक्त त्यांचे सामान होते.
रत्नागिरी शहरात लागोपाठच्या घटनांनी खळबळ दोन आठवड्यांपूर्वी मिऱ्या येथे माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून पकरणाने खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी रत्नागिरी राम नाक्यात एका व्यावसायिकाला तिघांनी लुटण्याचा प्रकार घडला. त्या मागोमाग मंगळवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास माळनाका येथे एका महिलेला लुटण्यात आले. दिवसाढवळ्या घडलेल्या या लुटीच्या घटनांत भर म्हणून व्यापारी बेपत्ता होण्याची नवीन घटना समोर आल्याने जोरदार खळबळ उडाली आहे.
व्यापाऱ्याच्या घातपाताची चर्चा रत्नागिरी शहरातील काही व्यापारी कोठारी यांच्याकडून सोने-चांदी विकत घेत असत. दरम्यान या व्यवहारासाठी रत्नागिरीत आलेले असतानाच कोठारी यांचा काटा काढल्याची व त्यात एका व्यापाऱ्याचा हात असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
मोबाईलचे लोकेशन मुंबई असल्याचे समोर किर्तीकुमार कोठारी रत्नागिरीत आले असता सोबत त्यांचा मोबाईलही होता. ते बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासण्यात आले असता ते मुंबई दर्शवले गेल्याने नातेवाईक व पोलीसही चकावून गेले. त्यांचे लोकेशन दाखविण्यासाठी त्यांचा मोबाईल मुंबईला पाठवण्यात आला तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र ते मुंबईला न परतल्याने त्याचे नातेवाईकच रत्नागिरीत दाखल झाले.
घातपाताच्या संशयावरून पोलीस संशयितांजवळ पोहचले या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वेगाने तपासचक्रे फिरवली आहेत. दरम्यान पोलीस संशयिताच्या जवळ पोचल्याचे व संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी सूत्रे हलली असल्याचेही सांगितले जात आहे. बाजारपेठेतील एका ज्वेलर्स व्यापाऱ्यावर पोलिसांनी संशयाची सुई रोखली आहे.
गोखले नाका ते राम आळी पुन्हा आगाशे कन्याशाळेपर्यंत प्रवास मिळालेल्या माहितीनुसार, कोठारी गोखले नाकामार्गे राम आळीतून चालत जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले आहे. दरम्यान परत वळून गोखले नाकामार्गे ते आगाशे कन्या शाळेपर्यंत चालत जाताना दिसल्याचे समोर आले. आगाशे कन्या शाळेजवळ आल्यानंतर त्यांचे पुढे काय झाले हा प्रश्न मात्र अनुत्तरित होता. या बाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती सायंकाळी उशिरापर्यंत प्राप्त झालेली नव्हती.
‘तो’ मृतदेह व्यापारी कोठारींचाच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी रत्नागिरी पोलीस यंत्रणा गुंतली होती. दरम्यान बुधवारी सायंकाळी रत्नागिरी-गुहागर-आबलोली मार्गावर खोडदे पुलाखाली नदीत गोणत्यात काहीतरी संशयास्पद असल्याची बाब परिसरात नागरिकांना दिसून आली. त्याविषयीची खबर पोलिसांना देताच घटनास्थळी सारी यंत्रणा धावून गेली. गोणत्याची चाचपणी करताच त्यामध्ये मृतदेह दिसून आला. हा मृतदेह व्यापारी किर्तीकुमार कोठारी यांचाच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा घातपात झाल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.