रेल्वेतून मोबाईल मुंबईला नेल्याचा संशय : पोलिसांना चकवा देण्यासाठी संशयितांचा प्रयत्न
प्रतिनिधी/रत्नागिरी
ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजय राज कोठारी यांचा खून केल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे लोकेशन मुंबई असल्याचे आढळून आले. कोठारी रत्नागिरीतून मुंबईत गेल्याचे दाखवण्यासाठी संशयित आरोपींकडून हा चकवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कोठारी यांचा रत्नागिरीत खून झाल्याचे उघड झाल्यानंतर आता त्यांचा मोबाईल मुंबईत कसा गेला व कोणी नेला, याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी 19 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाले होते. या संबंधी 21 सप्टेंबर रोजी त्यांचा मुलगा करण कोठारी याने रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कोठारी भाईंदर येथील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने पोलिसांकडून तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यात आली. पोलिसांकडून कोठारी यांचे मोबाईल लोकेशन शोधण्याचा प्रयत्न झाला असता ते मुंबईत असल्याचे दिसून आले.
हे ही वाचा : सोने-चांदी व्यापाऱ्याचा रत्नागिरीत घातपात, भाईंदर येथील प्रसिध्द व्यापारी
दरम्यान, पोलिसांच्या तपासात गोखले नाका येथील त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण खेडेकर याने आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने कोठारी यांचा खून केल्याचे समोर आले. यानंतर कोठारी यांचा मृतदेह रिक्षात टाकून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वहाळामध्ये टाकण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी भूषण सुभाष खेडेकर (42, खालची आळी, रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलपसाद चौगुले (39, मांडवी-सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, भाट्ये, खोतवाडी) यांना अटक केली आहे.
तीनही संशयित आरोपी रत्नागिरीत असताना कोठारी यांचा मोबाईल मुंबईपर्यंत पोहचला कसा, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून काढण्यात आलेल्या मोबाईल लोकेशननुसार हा मोबाईल कोकण रेल्वेमार्गे मुंबईत गेल्याचे समोर आले आहे. हा मोबाईल मुंबईत कोणी नेला, या खून प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या बाबत आता पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. कोठारी यांचा मोबाईल हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून आता प्रयत्न करण्यात येत आहेत.
संशयितांना गुरूवारी मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता शहर पोलीस निरीक्षक विनीत चोधरी यांनी कोठारी यांचा मोबाईल तपास कामात अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगितले संशयितांनी कट रचून कोठारी यांचा खून केला होता. या मागे काही आर्थिक देवघेव झाली होती का तसेच मृताचे कपडे, त्यांची बॅग आदी हस्तगत करावयाची असल्याने 10 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती.
28 सप्टेंबरपर्यंत संशयितांना पोलीस कोठडी
संशयित आरोपींच्या वकिलांनी न्यायालयापुढे सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना पकडले आहे. संशयितांनी खून केला, यात काहीही तथ्य नसून पोलिसांनी खूनाची कथा रचली आहे. संशयित गुरूवारी सकाळपासून पोलिसांच्या ताब्यात असताना कपडे, मोबाईल व इतर वस्तू जप्त का करण्यात आले नाहीत. तसेच रिक्षा जप्त करण्यासाठी संशयितांची पोलीस कोठडी कशासाठी, असा युक्तीवाद संशयितांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. दरम्यान न्यायालयाने 28 सप्टेंबरपर्यंत संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे.