आर्थिक व्यवहारातून काढला काटा : तिघा संशयितांना अटक : 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी : मुंबईतील व्यापारी खून प्रकरण
प्रतिनिधी/रत्नागिरी
ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजय राज कोठारी यांचा नायलॉनची दोरी कोठारी यांच्या गळ्याभोवती आवळून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. गळा आवळताना कोठारी हे आरडाओरडा करू नये, यासाठी अन्य एकाने जबड्यात हात घातला. तर अन्य दोघांनी गळ्याभोवती दोरी करकचून आवळून धरली. यामुळे काही क्षणातच कोठारी यांचा मृत्यू झाला, असे पोलीस तपासात पुढे आले आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
भूषण सुभाष खेडेकर (42, रा. खालची आळी रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलप्रसाद चौगुले (39, रा. मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, रा. भाट्ये खोतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी भादंवि कलम 302, 201 व 120 ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुरूवारी संशयितांना मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी हे 19 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाले होते. या संबंधी त्यांचा मुलगा करण कोठारी याने रत्नागिरी शहर पोलिसांत तकार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासामध्ये गोखले नाका येथील त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण खेडेकर याने आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने कोठारी यांचा खून केल्याचे समोर आले. यानंतर कोठारी यांचा मृतदेह हा गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वहाळामध्ये टाकण्यात आला.
आर्थिक व्यवहारातून झाला होता वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण खेडेकर व किर्तीकुमार कोठारी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक देवाणघेवाणीतून वाद होता. 19 सप्टेंबर रोजी कोठारी हे रत्नागिरीत आले असता त्यांनी भूषण याच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे देण्याच्या बहाण्याने भूषण याने 19 सप्टेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास कोठारी याला आपल्या त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात बोलावून घेतले. किर्तीकुमार दुकानात आले असता भूषण याने दुकानाचे शटर खाली ओढून घेतले. यावेळी भूषण याचे मित्र महेश चौगुले व फरीद होडेकर हे देखील उपस्थित होते.
हे ही वाचा : सोने-चांदी व्यापाऱ्याचा रत्नागिरीत घातपात, भाईंदर येथील प्रसिध्द व्यापारी
नायलॉनच्या दोरीने आवळला गळा
सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास भूषण व किर्तीकुमार यांच्यात पुन्हा एकदा पैशावरून वाद झाला. याचा राग येवून भूषण याने किर्तीकुमार याची मान हाताच्या बगलेत आवळून धरली. यावेळी किर्तीकुमार हे ओरडू नयेत, यासाठी फरीद होडेकर याने किर्तीकुमार याच्या जबड्यात हात घातला. यावेळी महेश चौगुले, भूषण खेडेकर यांनी किर्तीकुमार यांच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी फिरवून करकचून आवळली. यामध्ये काही क्षणात किर्तीकुमार यांचा तडफडून मृत्यू झाला.
रिक्षातून मृतदेह आबलोलीला नेला
किर्तीकुमार यांचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळ मृतदेह त्रिमूर्ती दुकानातच ठेवण्यात आला होता. यानंतर रात्रीच्या सुमारास किर्तीकुमार यांचा मृतदेह एका मोठ्या गोणीत भरण्यात आला. तसेच ही गोणी महेश चौगुले याच्या रिक्षात टाकून मृतदेह गुहागर येथील आबलोली येथे टाकण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्य हायवेने पकडलो जावू, या भीतीने संशयितांनी मजगांवमार्गे करबुडेकडे रिक्षा नेली. पुढे भातगाव पूलमार्गे जात गुहागर आबलोली येथे नेण्यात आला. एका जंगलमय भागातील वहाळात गोणीत भरलेला मृतदेह टाकण्यात आला.
शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात
गुहागर तालुक्यातील आबलोली येथे मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. किर्तीकुमार यांचा खून झाल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह गुरूवारी जिल्हा शासकीय रूग्णालय रत्नागिरी येथे आणण्यात आला.