प्रशासनाकडून रितसर परवानगी नाहीच; रात्रीची वाहतूक मात्र पूर्णत: बंदच
चिपळूण प्रतिनिधी
दरडींमुळे पावसाळ्यात धोकादायक बनलेल्या आणि दिवसा केवळ अवजड वाहनांसाठी सुरू केलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सध्या लहान-मोठी सर्वच प्रकारची वाहतूक सुरू झाली आहे. पावसाच जोर कमी झाल्याने दरडींचा धोका तूर्तास टळल्याने प्रशासनाकडून परवानगी नसतानाही वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली तर 1 ऑगस्टपासून घाट पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात जोरदार पावसाने घाटात कोसळलेल्या दरडी, माथ्यावरील डोंगराला गेलेल्या भेगा यामुळे घाटातील प्रवास धोकादायक बनला होता. त्यामुळे प्रशासनाने दहा दिवस हा घाट पूर्ण बंद ठेवला. मात्र 13 जुलैपासून सकाळी 6 ते रात्री 7 पर्यंत अवजड वाहनांसाठी हा घाट सुरू करण्यात आला. गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरल्याने घाटात दरडींचा धोकाही कमी झाला आहे. परिणामी घाटात अवजड, हलक्या वाहनांसह दुचाकीस्वारही बिनधास्तपणे प्रवास करू लागले आहेत. या संदर्भात घाटातून हलक्या वाहनांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिली गेलेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोसळणाऱ्या दरडींच्या पार्श्वभूमीवर घाटात कंत्राटदार कंपन्यांकडून 6 दरडप्रवण क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शिवाय फ्लडलाईटसह आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीही 24 तास दोन्ही बाजूने तैनात आहे. पावसाचा ओसरलेला जोर असाच राहिला तर 1 ऑगस्टपासून हा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे.