15 जण कारवाईच्या कचाट्यात; 7 किलो प्लास्टीक जप्त तर 30 हजारांचा दंड ठोठावला
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र शासन प्लास्टिक बंदी अधिनियम 2016 नुसार रत्नागिरी शहरात प्लास्टिक बंदीसंदर्भात कडक कारवाई करण्यात येत आहे. शहरातील 15 पेक्षा जास्त आस्थापनांच्या पाहणीत 7 किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. संबंधितांकडून 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
रत्नागिरी नगर परिषदेच्यावतीने स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्यावतीने सब रिजनल ऑफिसर राहुल मोटे तसेच अमित लाट्ये यांनी शहरातील 15 पेक्षा जास्त आस्थापनांची पाहणी केली. त्यात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी शहरातील राम आळी ते गोखले नाका या व्यापारी भागातून 7 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच विविध आस्थापनांच्या माध्यमातून 30 हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला. ही कारवाई मोहीम पुढेही शहरात सिंगल युज प्लास्टिक वापरताना आढळून आल्यास त्या आस्थापनांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरातील सर्व नागरिक, व्यापारी बंधूंनी जास्तीत-जास्त कापडी, कागदी पिशवीचा वापर करुया व आपल्या रत्नागिरी शहराला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त करुया, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे .