भटकंती म्हणजेच फिरणं… आणि फिरणं कुणाला आवडत नाही. सुट्टी असली की आपण कुठं ना कुठं फिरायला जातोच. मग ते ऐतिहासिक ठिकाण असो व तीर्थ क्षेत्र…महाराष्ट्रात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. कोकण हा निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग आहे. त्यामुळे कोकणाचं सौंदर्य सर्वानाच भुरळ पाडतं. इथली पर्यटन स्थळे पर्यटकांना वारंवार पहावीशी वाटतात. त्यापैकीच मुंबई गोवा महामार्गानजीक असलेले एक प्रमुख शहर म्हणजेच ‘रत्नागिरी’… या शहराला ‘रत्नागिरी’ हे नाव तिथे असलेल्या किल्याच्या नावाने पडलं असं म्हटलं जातं. हा किल्ला म्हणजेच रत्नदुर्ग…
ऑनलाईन टीम/तरुण भारत
रत्नागिरी शहरापासून अवघ्या ३-४ कि.मी. वर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे. किल्ल्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. या किल्ल्यावरून निसर्गाचा अद्भुत नमुनाडोळ्यांचे पारणे फेडतो.
रत्नागिरी शहरापासून सुमारे काही किलोमीटर अंतरावर सागर किनारी उंच डोंगरावर पुरातन असा रत्नदुर्ग किल्ला. रत्नदुर्ग हा ‘भगवती किल्ला’, ‘रतनगड’ या नावाने देखील ओळखला जातो. रत्नदुर्ग’ शिलाहार राज्याच्या कारकिर्दीत, राजा भोज याने इ. स. १२०५ मध्ये बांधला असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे.
रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा आहे. या किल्ल्याचं क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्नदुर्गला तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेलं आहे. तर फक्त आग्रेय दिशेला जमीन आहे.
किल्ल्याला ९ बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण २९ बुरुज आहेत. पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत हा किल्ला विभागला गेला आहे. गाडी रस्त्याने आपल्याला खाजगी वाहनाने किंवा रिक्षाने किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत जाता येते. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंतच भाविक आणि पर्यटकांसाठी खुले ठेवले जाते. याच वेळेत भाविक आणि पर्यटकांना किल्ला परिसरात प्रवेश दिला जातो. तर किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.
किल्ल्यावर पाहण्यासारखं काय….
रत्नदुर्गाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर जाताच समोर दोनही बाजूंना दोन भल्यामोठ्या हत्तीवर स्वार असलेल्या मावळ्यांचे शिल्प नजरेत भरते. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आतमध्ये एक मारुतीचे लहानसे मंदिर आहे. हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर थोड्याच अंतरावर सुबक बांधणीचे श्री देवी भगवतीचे शिवकालीन भव्य मंदिर आहे. मोठा सभागृह आणि गाभारा अशी मंदिराची रचना असून गाभाऱ्यात अडीच ते तीन फूट उंचीची देवी भगवतीची मूर्ती आहे. चांदीचा तांदळा असलेल्या मूर्तीमागे सोनेरी प्रभावळ आहे.
दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सवासह अनेक सण उत्सव येथे भक्तिभावाने साजरे केले जातात. भगवतीदेवीच्या मंदिराचा तीन वेळा जीर्णोद्धार करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक सांगतात. रत्नदुर्ग किल्ला परिसरातील दुर्गादेवी मंदिर ही मिळकत दानशूर श्री. भागोजी शेठ बाळोजी कीर कुटुंबियांची खाजगी मालमत्ता आहे. तसे दर्शविणारा फलक दर्शनीय तटभिंतीवर लावलेला आहे.
श्री भगवती देवी मंदिर…
किल्ल्यावर असणाऱ्या भगवती देवीच्या मुख्यमंदिरासमोरच एका दीपमाळेच्या जवळ ‘सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रे’ यांचा अर्धकृती पुतळा आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन समोरच असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीवरून फेरफटका मारण्याचा मोह आपण आवरूच शकत नाही. किल्ल्यावरून दिसणारा थांग समुद्र आणि निसर्ग सौदर्य थक्क करणार आहे. तटबंदीवरून थोडं पुढे चालत गेल्यावर बसक्या बुरुजावर उभारलेला एक उंच स्तंभ नजरेस पडतो….
किल्ल्यावरील भगवती मंदिर, विहीर, भुयार ही वैशिष्ट्ये बघत असतांनाच गडावरून अथांग पसरलेल्या सागरात विहार करणाऱ्या बोटी आपले लक्ष वेधून घेतात. तटबंदीच्या खाली खडकांवर आदळणाऱ्या समुद्राच्या पांढऱ्याशुभ्र लाटांचं मनोहारी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत ड्रोण कॅमेराच्या माध्यमातून पोहचवत आहोत.
अनेक शतकं रत्नागिरी परिसराचा राखणदार आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्याला भेट दिल्याशिवाय कोकण ट्रिप पूर्ण होऊच शकत नाही. रत्नागिरीला गेल्यावर या किल्ल्याला अवश्य भेट