4 दिवसांपासून स्वयंचलित पर्जन्यमापनावर आकडेवारीच नाही : नदीतील जलपातळीच्या नोंदीही अव्वाच्या सव्वा : कोट्यवधी खर्च करूनही आपत्तीकाळात उपयोग शून्य : नेटवर्क अभावी रेनगेज स्टेशन बंदच पारंपरिक केंद्र अन् स्वयंचलित यंत्रणेच्या आकडेवारीतही तफावत
प्रतिनिधी/चिपळूण
पावसाळ्यातील धोका ओळखून आणि त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करून जिल्ह्यात खेड, चिपळूण आणि राजापूर येथील नद्यांवर आरटीडीएएस अर्थात रियल टाईम डेटा सिस्टीम ही अत्याधुनिक सिस्टीमसह 9 ठिकाणी एआरएस म्हणजेच ऑटोमेटीक रेनगेज स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र गेले 4 दिवस जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर असतानाही महत्त्वाच्याक्षणी ही यंत्रणा पूर्णता फेल ठरली आहे. बंद पडलेल्या या यंत्रणेमुळे नद्यांमधील पाणी पातळी अव्वाच्या सव्वा मीटर, तर पर्जन्यमापन केंद्रावर आकडेच गायब झाले आहेत. गरजेच्यावेळी ही यंत्रणा बंद पडत असेल तर तिचा उपयोग काय, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
जिल्ह्यात खेड तालुक्यातील चाटव, पोयनार, नातूवाडी, दाभिळ, चिपळूण तालुक्यातील करंबवणे, नांदिवसे, दाभोळखाडी, राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण, आडिवरे या नऊठिकाणी एआरएस अर्थात ऑटोमेटीक रेनगेज स्टेशन, तर खेडमधील जगबुडी, चिपळूण येथील बहाद्दूरशेख नाका वाशिष्ठी नदी आणि राजापूर येथील अर्जुना नदी या तीनठिकाणच्या नद्यांवर आरटीडीएएस ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. यासाठी जलसंपदा विभागामार्पत एक लिंकदेखील देण्यात आली असून या लिंकवर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यातल्या तीन नद्यांच्या पाण्याची पातळी आणि 9 ठिकाणचे पर्जन्यमान अचूक मिळेल असे सांगण्यात आले.
जूनमध्ये सुरूवातीला ही यंत्रणा चालली मात्र जसजसा पावसाचा जोर वाढला तसा या यंत्रणेत बिघाड होत गेला. त्यामध्ये पारंपरिक केंद्र आणि स्वयंचलित यंत्रणांमधील पर्जन्यमान आणि जलपातळी यांच्यातील आकडेवाडीमध्ये मोठी तफावत आढळून येऊ लागली. स्थानिक प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाच्या सहाय्याने ही यंत्रणा बसवणाऱ्या पुण्यातील मेट्रोनिक्स प्रा. लि. कंपनीला कळवले. मात्र त्याचा उपयोग होताना सध्या दिसत नाही.