पोलिसांच्या तपास कार्याला मिळाला महत्वाचा पुरावा-डाॅ मोहितकुमार गर्ग : मृतदेह पेट्रोल आणि भाताचा पेंढा टाकून जाळल्याचेही आले उघडकीस
प्रतिनिधी/रत्नागिरी
पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत हिच्या खून प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी सखोल तपासाला गती देत आणखीन काही महत्वाच्या पुराव्यांना गवसणी घातली आहे. तिचा खून केल्यानंतर मृतदेह जाण्यासाठी पेट्रोल व भाताचा पेंढ्याचा वापर केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यानंतर झालेली राख सुमारे 18 ते 20 पिशव्यात भरून ती समुद्रात टाकून नष्ट केली. आणखीन महत्वाचे म्हणजे जाळलेल्या मृतदेहातील हाडांचे अवशेष पोलिसांना मिळवण्यात यश आलेले आहे. आता हे पुरावे पुढील तपासणीसाठी फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक डाॉ. मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्वप्नाली सावंत खून प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यात रत्नागिरी पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे होते. पण गेल्या आठवडाभरात स्वप्नाली सावंत हिच्याविषयी पोलिसांकडे दाखल झालेली बेपत्ता म्हणून नोंद व त्यानंतर तिच्या घातपाताचा विषय तपासाच्या दृष्टीने जटील विषय बनलेला होता. बेपत्ता झालेली असतानाच तिचा झालेला घातपाताचा उघडकीस आलेला विषय त्यानंतर अजूनही न मिळून आलेला मृतदेहामुळे हे सारे प्रकरणच जटील बनलेले होते. पण जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे या गुढ प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यात पोलिसांनी यश मिळवलेल आहे. त्यासंदर्भात केलेल्या तपासाची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
तपासकामी जप्त केलेल्या त्या भौतीक पुराव्यावरुन अटक आरोपी सुकांत गजानन सावंत, रुपेश ऊर्प छोटा भाई सावंत व पम्या ऊर्प प्रमोद गावणंग यांनी पूर्वनियोजनाने व शांतपणे स्वप्नाली सावंत हिचा मिऱ्याबंदर येथील घरी असताना गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह घराच्या आवारातच जाळल्यानंतर उरलेली राख समुद्रात व इतरत्र टाकून दिली. पण या तपासात पोलिसांनी केलेल्या पुराव्यांच्या शोधकार्यात 8 ते 10 हाडांचे अवशेषही जप्त हस्तगत केलेले आहेत. हे अवशेष मृत स्वप्नालीच्या खूनावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी तिचा मृतदेह जाळला त्या जागेची साफसफाई केल्याचे निष्पन्न झालेले आहे.