उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्ती : रत्नागिरी आवृत्तीच्या 27 व्या वर्धापनदिनी होणार गौरव
प्रतिनिधी/रत्नागिरी
कोकणातील वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘तरुण भारत’ची रत्नागिरी आवृती 28 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या 27 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत ‘तरुण भारत’तर्फे सामाजिक, कृषी, शैक्षणिक, पर्यावरण, वैज्ञानिक, रूग्णसेवा इत्यादी क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ९ रत्नांना ‘तरुण भारत सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
येत्या 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 6 वाजता रत्नागिरी शहरातील माळनाका येथील मराठा भवन मंगल कार्यालय सभागृहात हा गौरव सोहळा होणार आहे. या विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थींची नावे घोषित करण्यात आली आहेत. त्यात दापोली येथील डिस्टिंक्टीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासून संचालक म्हणून आपले योगदान देत विकासामध्ये तसेच ज्ञानगंगा घरोघरी पोहचवताना अनेकांसाठी प्रेरणा स्त्रोत बनलेल्या स्मिताली संदीप राजपुरे, जल फाऊंडेशनच्या माध्यमातून खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात गाववाड्या पाणीटंचाईमुक्ततेसाठी धडपड करणारी ‘आधुनिक भगीरथ’ जल फाउंडेशन-कोकण विभाग, खेड या संस्थेचा समावेश आहे.
तसेच दिव्यांग असूनही दुर्गम अशा मंडणगड येथील विन्हे गावात आपल्या शेतजमिनीत नंदनवन फुलवणारे व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सेंद्रीय शेतीचा आदर्श निर्माण करणारे रुपेश वामन पवार, सह्याद्रीच्या रक्षणासाठी जीवाचा कोट करत चांदोली व कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलातील आदिवासी पाड्यांना स्वतःचं दुसरं घर समजून वावरणारी चिपळूण-अलोरे येथील सोनल एस. प्रभुलकर, भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्ती झाल्यानंतरही माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अहोरात्र झटणारे संगमेश्वर-ओझर खुर्द येथील माजी सैनिक पुंडलिक गणपत पवार, गुहागर तालुक्यातील विविध गावांमध्ये असलेल्या अडचणी सोडवताना केवळ शासनाकडे बोट न दाखवता छोट्या-मोठ्या विकासकामांसाठी स्वतः खर्च करणारे, मुंबईमध्ये गरजूंसाठी तसेच रुग्णांसाठी सदैव आर्थिक हातभार लावणारे व्यक्तिमत्व म्हणून गुहागर-नरवणचे सुपुत्र संतोष लक्ष्मण जैतापकर, शहरीकरणामुळे रखरखीत झालेल्या जगण्याला ‘ग्रीन टच’ देण्याचं कामगिरी करणाऱ्या रत्नागिरीतील नरबे येथे नावीन्यपूर्ण ‘प्लांट लायब्ररी’ उदयास आणणाऱ्या माधुरी प्रतीक कळंबटे, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या 14 व्या बॅचमधून उत्तीर्ण होत चेन्नई येथे अणुभट्टी कार्यकमात वैज्ञानिक अधिकारी म्हणून सेवा बजावणारे लांजातील बासितअली सादिक नेवरेकर, कोरोना काळात गावातील मुलांना अध्यापन करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणारे राजापूर पन्हळेतर्फे येथील उमेश गोकुळ शिवगण यांची ‘तरूण भारत सन्मान-2022’ साठी निवड करण्यात आली आहे.