जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र शिक्षकांच्या खिळल्यात नजरा; बदलीने सोडणार की रिक्त पदांच्या गर्ततेमुळे जागेवर थांबणार, या बाबत प्रश्नच
प्रतिनिधी/रत्नागिरी
गेल्या 2 वर्षापासून कोविडमुळे प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची रखडलोली प्रक्रिया यावर्षीही होण्यासंदर्भात असलेला संभ्रम आता आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने दूर झाला आहे. आंतरजिल्हा शिक्षकांची बदली प्रकिया झाल्याने जिल्हांतर्गत बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या संदर्भात पुढील आठवड्यात जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळपत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. बदलीसाठी पात्र असताना बदली होत नसल्याने हा अन्याय असल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे. शिक्षकांच्या बदल्या या संवर्ग 1, संवर्ग 2 आणि सर्वसाधारण अशा प्रकारे होणार आहेत. शिक्षण विभागाकडूनही रिक्त पदांचा तपशील ग्रामविकास विभागाला सादर करण्यात आला. त्यानुसार प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने केली जात आहे. त्याची प्रक्रिया मागील महिन्यात पूर्ण झाली होती. प्रथम आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील 989 क्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन माहिती भरली होती. त्यातील 489 शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरले. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात 5 हजार 750 कार्यरत शिक्षक आहेत. दरम्यान, एकाच शाळेवर ५ वर्षे व सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे सेवा देणारे शिक्षक हे बदलीसाठी पात्र आहेत. यंदाच्या शिक्षकांच्या बदल्यांसाठी 2020-21 च्या अवघड शाळांची यादीनुसार करण्यात येणार आहेत. मात्र, शिक्षकांच्या बदलीसाठी वेळापत्रक जाहीर झाल्यावरच पुढील प्रकियेतून जाणाऱ्या शिक्षकांची आकडेवारीचे चित्र निश्चित समोर येणार आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांची पदसंख्येची स्थितीः
जिल्हा परिषदेच्या पावणेतीन हजार शाळांमध्ये मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षकांची १० टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. मराठी माध्यमातील शिक्षकांची 6 हजार 689 पदे मंजूर असून त्यातील 5 हजार 750 पदे भरलेली तर 939 पदे रिक्त आहेत. (14.4 टक्के प्रमाण). उर्दू माध्यमात 477 पदे मंजूर असून 390 भरलेली तर 87 पदे रिक्त असून हे प्रमाण 18.24 टक्के आहे. केंद्रप्रमुखांची 251 पैकी 82 पदे भरली गेली तर 169 पदे रिक्त असून 67.33 टक्के प्रमाण आहे. मुख्याध्यापकांची अवघी 19 पदेच भरलेली असून मंजूर 66 पैकी 47 म्हणजेच 71.21 टक्के पदे रिक्त आहेत.
आंतरजिल्हा बदलीने मागील प्रकियेवेळी मंजूर 300 जणांना अजूनही रिक्त पदांमुळे बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही. यंदा त्यात 489 जणांची भर पडली आहे. बदलीपात्र शिक्षकांना जिल्ह्यातच रहावे लागणार पात्र शिक्षकांना परजिल्ह्यात सोडले तर रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त पदांमध्ये मोठी भर पडेल. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होणार आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांचा आधार आहे. इंग्रजी ध्यमाकडील पालकांचा कल वाढत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पट कमी होत असल्याने शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे त्यात मोठी घसरण होऊ शकते.
ग्रामविकास विभागानेही रिक्त पदांची संख्या अधिक असल्यामुळे आंतरजिल्हा बदलीने पात्र ठरलेल्यांना सोडू नये, असे पत्र दिले आहे. त्यामुळे बदली होऊन संबंधित शिक्षकांना जिल्ह्यातच रहावे लागणार आहे. भरती करा तरच बदलीपात्र शिक्षकांना सोडणार मागील आठवड्यात शिक्षण सचिवांकडे झालेल्या बैठकीप्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या रिक्त पदांचा आढावा सादर केला आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यापूर्वी शिक्षकांची पदे भरावीत. तसेच भविष्यात होणाऱ्या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासंदर्भात वेगळे आदेश काढले जावेत, असा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून ठेवण्यात आला आहे.