औरंगाबाद मधील कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी महाविद्यलयातील विद्यार्थी
रायगड प्रतिनिधी
सध्या मुरुड तालुक्यातील पर्यटन ठिकाणावर शालेय सहली येण्याचे प्रमाणत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून सहली येत आहेत. काशीद समुद्र किनारा जगात प्रसिद्ध असल्याने आज ९ जानेवारी रोजी दुपारी ३ च्या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी महाविद्यलयातील माध्यमिक शाळेची इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांची सहल काशीद समुद्र किनारा पहाण्यासाठी आले होते. सुमारे ८० विद्यार्थ्यांचा समूह हा काशीद समुद्र किनारी उतरला होता.
यापैकी ६ जण काशीद समुद्र किनारी पोहण्यासाठी उतरले होते. पोहता पोहता हे ६ हि जण खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले जवळच असणाऱ्या लोकांना मुले बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या टाकल्या व ६ पैकी ४ जणांना समुद्र किनारी सुखरूप आण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णलयात उपचारासाठी भरती करण्यात आले.
तर उर्वरित दोघे जण खोल पाण्यात गेल्याने त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. यापैकी एकाचा मृतदेह त्वरित सापडला तर दुसरा मुलगा हा सापडत नव्हता. यासाठी स्थानिक नागरिक पोलिसांच्या मदतीने शोध कार्य सुरु ठेवल्यानंतर काही तासानंतर दुसरा मुलगा सुद्धा सापडला आहे. या सहलीतील शालेय विद्यार्थी प्रणव कदम व रोहन बेडवाल यांचे वय साधरण १५ वर्षापर्यंत सांगण्यात आले असून या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे मुरुड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.तर कृष्णा पाटील,तुषार वाघ व अन्य दोघांना वाचवण्यात येऊन त्यांना उपचारासाठी बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे.