जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना 10 जुलैपर्यंत दक्षतेचा इशारा : आतापर्यंत दरड व पूरपवण क्षेत्रातील 288 कुटुंबातील 966 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
प्रतिनिधी/रत्नागिरी
जिल्ह्याला गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार ते अतिवृष्टी स्वरूपाच्या पावसाबरोबरच वादळीवाऱ्याने अक्षरश झोडपून काढलेले आहे. आता तर भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, 10 जुलै 2022 या कालावधीपर्यंत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी 40-50 कि.मी ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जिल्ह्यात पावसाचे धुमशान अजूनही चालूच आहे. दक्षिण रत्नागिरीत या पावसाचा जोर बुधवारपासून काहीसा ओसरला असला तरी उत्तर रत्नागिरीला चिपळूण, खेड, दापोली, मंडणगडला या पावसाने चांगलाच धुमाकुळ घातलेला आहे. त्यात वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठी पडझड झाली आहे. गुरूवारी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 675 मिमि पर्जन्यमानाची 75 सरासरी नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पर्जन्यमान उत्तर रत्नागिरीत राहिलं आहे.