राऊत पत्राचाळ घोटाळय़ाचे मास्टरमांईंड ः ईडीचा आरोप
प्रतिनिधी/ मुंबई
पत्राचाळ घोटाळय़ाचे मास्टरमांईड आणि सर्वात मोठे लाभार्थी संजय राऊत हेच आहेत. त्यांच्या ईशाऱयावरुन प्रवीण राऊत यांनी अनेक व्यवहार केल्याचा सनसनाटी आरोप ईडीने सोमवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात केला आहे. राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीने हे आरोप करताना राऊत यांना दरमहा दोन लाख रूपये मिळाले असून सुमारे 1 कोटी 6 लाखांचा लाभ झाला आहे. यादिशेने तपास करण्यासाठी राऊत यांना आठ दिवसाची कोठडीची द्यावी, अशी विनंती केली. याची दखल घेत विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तसेच राऊत यांना घरचे जेवण आणि औषधे देण्याची परवानगी परवानगी दिली.
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीच्यावतीने विशेष सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी या घोटाळय़ाचे मास्टरमाईंड हे संजय राऊत आहे. त्यांच्याच ईशाऱयावरुन फ्रंट मॅन म्हणून प्रवीण राऊत यांनी अनेक व्यवहार केले. याबाबत जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांबाबत जबाब असल्याची माहिती दिली. ईडीने बजावलेल्या दोन समन्सवेळी गैरहजर राहून पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून अधिक चौकशीसाठी राऊत यांना आठ दिवसाची कोठडी द्यावी, अशी विनंती केली.
राऊत यांच्यावतीने ज्येष्ठ वकिल ऍड. मुदरगी यांनी जोरदार विरोध केला. आर्थिक गुन्हे शाखेने 2020 मध्ये पत्राचाळ प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मात्र प्रवीण राऊत यांच्या विरोधात गेल्या वर्षी ईसीआयआर नोंदवण्यात आला आणि त्यांना यावर्षी जानेवारीमध्ये अटक करण्यात आली. असे असताना संजय राऊतांना आतापर्यंत अटक करण्यात आली नव्हती, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना राऊतांची अटक ही राजकीय सूडबुद्धीने करण्यात आलेली आहे, असा आरोप केला. तसेच राऊत यांना ह्द्रय विकाराचा त्रास आहे. रात्री उशीरापर्यंत चौकशी केली जाऊ नये आणि त्यांना कमीत कमी कोठडी द्यावी, अशी विनंती केली.
याला सहमती दर्शवीत ईडीने राऊत यांना औषधे आणि घरचे जेवण देण्यास विरोध केला नाही. तसेच रात्री साडेदहा नंतर चौकशी केली जाणार नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. याची दखल घेत न्यायालयाने राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावताना त्यांना घरचे जेवण आणि औषध देण्याचे निर्देश दिले.
ठाकरेंनी दिला राऊत कुटुंबाला धीर
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री निवासस्थानी जात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राऊत यांच्या कुटुंबीयांना धीर देत त्यांना आपण वाऱयावर सोडणार नाही, संकटातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले. संजय राऊत हे एकटे नाहीत. शिवसेना परिवार राऊतांसोबत आहे, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना दिला. त्याचबरोबर भाजपला इशारा देताना ते म्हणाले, आजच्या राजकारणात बुद्धीचा नाही, बळाचा वापर केला जात आहे. नुसते बळ तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल, तर दिवस सर्वदा सारखे नसतात, दिवस फिरतात. दिवस फिरले तर… याचा विचार नड्डा आणि भाजपने करावा, असा इशाराच दिला. संजय राऊत यांना
सकाळचा भोंगा बंद झाला
संजय राऊत यांना रात्री उशिरा ईडीने अटक करताच ही कारवाई केवळ सूडापोटी होत आहे, गोरेगाव पत्रा चाळ घोटाळय़ाशी माझा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांच्याकडून देण्यात आले. ज्यांनी आम्हाला त्रास दिला ते आपल्या कर्माने जातील, असे सूचक विधान कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादेत केले होते. आता आवाज येणारच नाही. सकाळी 8 वाजताचा भोंगा बंद झाला. भोंगा आत गेला, असे शिंदे यांनी म्हटले आहे. चौकशीतूनच सत्य बाहेर येईल. कर नाही, त्याला डर कशाला, असे राऊत म्हणत होते. त्यामुळे त्यांनी घाबरू नये, असेही शिंदे म्हणाले.
कोर्ट ठरवेल
कोणतीही यंत्रणा पुराव्याच्या आधारे काम करते. यंत्रणेने काम केले आहे. जे काही आहे, ते कोर्ट ठरवेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
ही गैरव्यवहाराची चौकशी
संजय राऊत यांना गुन्हेगार म्हणून अटक करण्यात आली आहे. एवढी मोठय़ा प्रमाणात रक्कम घरी सापडणे योग्य नाही. ही लढाई स्वातंर्त्याची नाही, तर गैरव्यवहार झाला म्हणून ईडीची चौकशी करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.