भाजप 100 जागांपर्यंत मर्यादित राहणार असल्याच्या वक्तव्यावर टोला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विरोधकांनी एकजूट दाखविल्यास लोकसभा निवडणुकीत भाजप 100 जागांपर्यंत मर्यादित राहील, असा दावा करणाऱया नितीशकुमार यांना रविवारी रविशंकर प्रसाद यांनी कठोर शब्दात फटकारले. देशातील जनतेचा पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे नितीशकुमार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नितीशकुमारांना बिहार सांभाळता येत नसून ते देश हाताळण्याबाबत बोलत आहेत, असेही ते म्हणाले.
स्वतःचे राज्य सांभाळता येत नसताना नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाचे दावेदार बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाने खूप प्रगती केल्याची जाणीव भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला झालेली आहे. मात्र, नितीशकुमार अद्याप आपली राजकीय विश्वासार्हता प्रस्थापित करू शकलेले नाहीत, असेही रविशंकर यांनी ठणकावले. बिहार सध्या संकटात सापडलेले राज्य आहे. मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या पक्षातच अराजकता आहे. लालूंची संगत करून ते मोठय़ा राजकीय अडचणीत अडकलेले आहेत. अशा अवघड परिस्थितीत नितीशबाबूंना देवेगौडा किंवा इंदरकुमार गुजराल व्हायचे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत पुढे जात असल्याचे त्यांना दिसत नाही, असेही रविशंकर प्रसाद यांनी पुढे स्पष्ट केले.
यापूर्वी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भाजप नेते गिरिराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. नितीशकुमार पंतप्रधान होण्यासाठी आतुर असल्याचे त्यांनी म्हटले होते. 17 वर्षात बिहारचा विकास करता न आलेल्यांना पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडत असल्याचा टोला सिंह यांनी लगावला होता.