शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवलेंचा सवाल; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विधानाचा निषेध
कोल्हापूर प्रतिनिधी
करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराष्ट्र, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्याबरोबर कला, क्रीडा, सहकार, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील वैभवशाली परंपरा असलेल्या कोल्हापूरची शिव्या देणे हीच परंपरा असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यात केलेले विधान कोल्हापूरवासीयांसाठी संताप आणणारे आहे. या विधानातून त्यांनी कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेला केवळ रांगडी परंपरेत रूपांतरीत करून बट्टा लावण्याचे काम केले आहे, अशा शब्दात शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी प्रतिक्रिया दिली.
या संदर्भात दिलेल्या पत्रकात इंगवले यांनी म्हटले आहे : कोल्हापूरचा सर्वच क्षेत्रातील इतिहास आणि परंपरा देशात नव्हे तर परदेशात सर्वश्रृत आहे. अशा कोल्हापूरविषयी शिवी देणे हीच खासियत असल्याचे विधान करून चंद्रकांतदादांनी कोल्हापूरचे कोणते पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे, असा प्रश्न कोल्हापूरवासीयांना पडला आहे. वादग्रस्त विधाने करून त्यांनी कोल्हापूर जिल्हय़ात भाजपचे आणि स्वतःचे नुकसान केले. कोल्हापूर जिल्हय़ातील चारी विधानसभा मतदार संघातून निवडून येतो, अशा राणाभीमादेवी थाटात गर्जना चंद्रकांतदादांनी लक्षात ठेवावे की, राज्यात गद्दारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ता गिळंकृत करणाऱ्या भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी कोल्हापूरची जनता उत्सुक आहे. त्यांनी यापुढे किमान वादग्रस्त विधाने टाळावीत.