कोरोनापासून सुटका कधी, वातानुकुलीत यंत्रणा कोसळली, नव्या प्रकल्पासाठी येणार दोन कोटीहून अधिक खर्च
प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील रविंद्र भवन मागच्या दोन वर्षांपासून आजारी आहे. दोन वर्षांपासून कार्यक्रमांना फाटा मिळालेला आहे. रविंद्र भवनची वातानुकुलीत यंत्रणा कोसळल्यास जवळपास दोन वर्षे झाली आहेत. दोन कोटीहून अधिक खर्चाचे हे काम मार्गी लागल्यासच रविंद्र भवन पुन्हा ताजेतवाने होईल. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून वास्कोतील रविंद्र भवन आजारी असून या भवनची कोरोनापासून सुटका कधी होईल असा प्रश्न कलाप्रेमींना सतावत आहे.
मुरगाव तालुक्यासाठी असलेले वास्को बायणातील रविंद्रभवन तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नाही. ते तालुक्याच्या एका टोकाला किनाऱयावर आहे. या भवनचे किनाऱयावर असणे भवनला आणि कलाप्रेमींनाही त्रासाचे ठरलेले आहे. किनाऱयावरील खाऱया हवामानामुळे हा भव्य प्रकल्पच गंज पकडू लागला आहे. आठ वर्षांपूर्वी वास्कोतील रविंद्र भवन कार्यान्वीत करण्यात आले होते. मात्र, पाहिल्या दोन तीन वर्षांतच या भवनच्या तक्रारी वाढल्या होत्या. देखभालीचे ओझे वाढू लागले होते. मोडतोड, नादुरूस्ती असे प्रकारही सुरू झाले होते. या रविंद्र भवनच्या मागच्या बाजुने रविंद्र भवनसाठी वातानुकुलीत यंत्रणा उभारण्यात आली होती. या यंत्रणेच्याही कुरबुरी वाढू लागल्या होत्या. किनाऱयावरील खाऱया हवेच्या माऱयामुळे ही यंत्रणा गंजू लागली होती. कधी तरी ती कोलमडेल किंवा कोसळेल अशी शक्यता गृहीत धरण्यात आली होती. अखेर ही शक्यता खरी ठरली ती कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात. या भवनमधील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रेक्षागृहाला या वातानुकुलीत यंत्रणेचाच आधार होता. तो कोसळल्याने हे प्रेक्षागृह बंद अवस्थेतच आहे. त्यामुळे मागच्या दोन वर्षांत कोणतेच कार्यक्रम या रविंद्र भवनात होऊ शकलेले नाहीत. हा प्रेक्षागृह बंदच असल्याने त्याच्या समस्या अधिकच वाढलेल्या आहेत.
या सांस्कृतीक केंद्राची कोरोनापासून सुटका कधी, कलाप्रेमींना पडलेला प्रश्न
2020 च्या मार्च अखेरीस कोरोना संसर्ग उफाळून येताच सर्वच व्यवहार बंद झाले. त्यात सर्वच रविंद्र भवने, सांस्कृतीक केंद्रे, हॉल, प्रेक्षागृह, थिएटर असे सर्वच बंद झाले. गंजलेली वातानुकुलीत यंत्रणा कोसळण्याच्या मार्गावर आलेले व कार्यक्रम खंडीत होतील अशी शक्यता असलेले वास्कोतील रविंद्र भवनही त्या काळात बंद राहिल्याने थोडे अधिक दुर्लक्ष झाले आणि वातानुकुलीत यंत्रणा थोडी लवकर कोसळण्यास मदत झाली. हळुहळु कोरोना ओसरला आणि काही महिन्यांनंतर रविंद्र भवनचे व्यवहार थोडय़ा प्रमाणात पुन्हा सुरू झाले. परंतु दुसऱया लाटेच्या काळात पुन्हा खंड पडला आणि आता वातावरण पूर्वपदावर आलेले आहे. कला वर्ग सुरू झालेले आहेत. या भवनचे मोठे प्रेक्षागृह मात्र, वातानुकुलीत यंत्रणेअभावी सुरू होऊ शकलेले नाही. छोटे हॉल व परिषद गृह तेवढे उपलब्ध आहे. सुमारे दीडशे आसन क्षमता असलेल्या छोटय़ा हॉलमध्ये काही छोटे कार्यक्रम तेवढे होत असतात. गोव्यातील सर्व सांस्कृतीक केंद्रे सुरू झालेली असली तरी वास्कोतील केंद्र मात्र, दोन वर्षे आजारीच आहे. या भवनची कोरोनापासून सुटका कधी होईल असा प्रश्न कलाप्रेमींना पडलेला आहे.
कला व संस्कृती खात्याने प्रश्न गांभिर्याने घ्यावा
रविंद्र भवनची वातानुकुलीत यंत्रणा गंजून कोसळताच साधारण दीड वर्षापूर्वी नवीन यंत्रणा उभारण्यासाठी विचारविनिमय सुरू झाला होता. मात्र, कला व संस्कृती खात्याने वास्कोतील रविंद्र भवनची सोय करण्यासाठी गांभिर्याने पावले उचललेली नाहीत. कला व संस्कृती खात्याने त्वरीत उपाययोजना करावी व वास्कोतील रविंद्र भवनमधील कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी मदत करावी अशी मागणी स्थानिक कलाप्रेमींकडून होत आहे.
रविंद्र भवनच्या नवीन प्रकल्पासाठी 2 कोटीहून अधिक खर्च, प्रक्रिया सुरू- जयंत जाधव
वास्कोतील या रविंद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार रविंद्र भवनच्या वातानुकुलीत यंत्रणेचा विषय सरकार दरबारी पोहोचलेला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हे काम केले जाणार आहे. प्रक्रिया सुरू आहे. रविंद्र भवनसाठी नवीन वातानुकुलीन यंत्रणा उभारण्यासाठी दोन कोटीहून अधिक रक्कम खर्च होणार आहे. हा प्रकल्प खुला असणार नाही. त्याला शेड असेल व तो सुरक्षीत असेल असे जाधव म्हणाले. वास्को रविंद्र भवनची नवीन समितीही लवकरच निवडली जाणार आहे. रविंद्र भवनच्या सुधारणेसाठी व अडचणी दूर करण्यासाठी तसेच कार्यक्रम व इतर संबंधीत विषयांवर चर्चा करण्यासाठी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांचीही भेट घेण्यात येईल असे ते म्हणाले.
वास्कोतील मुस्लीम शिष्टमंडळाचे पोलीस महासंचालकांना निवेदन
वास्कोतील मुस्लीम समाजातील काही नागरीकांनी सोमवारी गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हल्लीच वास्कोत घडलेल्या धार्मिकवादाची माहिती पोलीस महासंचालकांना दिली. यासंबंधी त्यांनी एक निवेदनही महासंचालकांना दिले. या निवेदनात त्यांनी काही दिवसांपूर्वी वास्को ईस्लामपूर बायणा भागात संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी काही हिंदु मुलतत्ववादय़ांनी मुस्लीम धर्मियांवर अत्याचार केल्याचे स्पष्ट करून महासंचालकांना या घटनेविषयी माहिती दिली आहे. मुस्लीम नागरीकांच्या या शिष्टमंडळात नझीर खान, रियाज कद्री, साजीद खान व नागरिकांचा समावेश होता.
फोटो- 0425व्ही4
पणजी ः पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांना निवेदन सादर करताना नझीर खान, रियाज कद्री, साजीद खान व इतर.