संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये अनुक्रमे कसब्यामध्ये रविंद्र धंगेकर विजयी झाले तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. यावर महाविकास आघाडीचे नेते म्हणून अजित पवार यांनी रविंद्र धंगेकर यांचे अभिनंदन केले. तसेच चिंचवडमधील दोन्ही उमेदवाराची बेरीज ही भाजपच्या उमेदवारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भाजपला हा इशारा सल्याचे म्हटले आहे.
पुण्यात बोलताना अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “आज माझी अवस्था कही खुशी कही गम अशी झाली आहे. महाविकास आघाडीने उमेदवार देत असताना रविंद्र दंगेकर यांना उमेदवारी देउन पहीली लढाई तिथेच जिंकली होती. रविंद्र धंगेकर हा लोकांमध्ये लोकप्रिय आहेच पण लोकांची अडचणी सोडवण्याचे काम त्याचे चांगले आहे. यापुर्वी खुप मोठ्या ताकतीच्या उमेदवाराचा पराभव त्यांनी केला होता.” असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसब्यात ठाण मांडून होते. सत्ताधाऱ्यांकडून अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला. तिथल्या मतदारांनीही या गोष्टीचा उलगडा माध्यमाद्वारे केला. सत्ताधाऱ्यांच्या या गोष्टींचा निषेध करून रविंद्र धंगेकरांनी सत्याग्रहही केला. सत्ताधारी पक्षांनी सर्व यंत्रणांचा वापर केला. पण शेवटी विजय रविंद्र यांचा झाला. त्याबद्दल मी सर्व मतदारांचं, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आणि रविंद्र धंगेकर यांचे अभिनंदन करतो.”
शेवटी बोलताना ते म्हणाले, “या दोन्ही निवडणुका भावनिक होत्या. पण त्यामध्ये सहानुभुती असे म्हणता येणार नाही. शिंदे गटाने शिवसेनेचा पक्ष आणि पक्ष चिन्ह काढून घेतला. त्यामुळे कसब्यातील शिवसैनिकांनी त्यांना धडा शिकवला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वरिष्ठांना खडसावून सांगितले कि रविंद्र धंगेकर यांना आमचा पाठींबा आहे. तुम्ही आम्हाला पक्षाबाहेर काढायचे असेल तर काढून टाका. शेवटी जनतेने निश्चय केला तर कोणत्याही शक्यतेला अर्थ राहत नाही. याचा विचार सत्ताधारी पक्षांनी करावा” असा इशारा त्यांनी शिंदे- भाजप युतीला दिला आहे.