आयपीएल : प्लेऑफ प्रवेशाची संधी, सामनावीर कोहलीचे अर्धशतक, हार्दिकचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था /मुंबई
सामनावीर विराट कोहलीने सूर गवसल्यानंतर झळकवलेले शानदार अर्धशतक आणि डय़ू प्लेसिस व मॅक्सवेलची समयोचित फलंदाजी यांच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने आयपीएल साखळीतील शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 8 चेंडूत बाकी ठेवत 8 गडय़ांनी दणदणीत पराभव करून 16 गुणांसह गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली. प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी मात्र त्यांना दिल्ली-मुंबई लढतीच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.
कर्णधार हार्दिक पंडय़ाने नोंदवलेल्या अर्धशतकामुळे गुजरात टायटन्सने 20 षटकांत 5 बाद 168 धावा जमविल्या. त्यानंतर आरसीबीने 18.4 षटकांत 2 बाद 170 धावा जमवित या हंगामातील आठवा विजय साकार केला. 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोहली व डय़ू प्लेसिस यांनी 14.3 षटकांत 115 धावांची शतकी सलामी देत विजय सोपा केला. या हंगामातील दुसरे अर्धशतक नोंदवणाऱया कोहलीने 73 धावांचे योगदान देताना 54 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार मारले. त्याचा जोडीदार डय़ू प्लेसिसने 38 चेंडूत 44 धावा जमविल्या. कोहली बाद झाला तेव्हा आरसीबीला अद्याप 23 धावांची गरज होती. मॅक्सवेलने दिनेश कार्तिकच्या साथीने विजयाचे सोपस्कार 19 व्या षटकात पूर्ण केले. मॅक्सवेल 18 चेंडूत 40 धावांवर तर कार्तिक 2 धावांवर नाबाद राहिला. मॅक्सवेलने आपल्या खेळीत 5 चौकार व दोन षटकार मारले.
दिल्लीच्या निकालावर आरसीबीचे भवितव्य
आरसीबी आता चौथ्या स्थानावर असले तरी त्यांचे प्लेऑफमधील स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. दिल्लीच्या सामन्याच्या निकालावर त्यांचा पुढील प्रवेश निश्चित होणार आहे. आरसीबीचा रनरेट -0.253 तर दिल्लीचा रनरेट 0.255 आहे. मुंबईविरुद्ध दिल्लीने विजय मिळविल्यास त्यांचा रनरेट सरस असल्याने 16 गुणांसह ते प्लेऑफमध्ये जातील तर आरसीबीचे आव्हान संपुष्टात येईल. आणि जर मुंबईने विजय मिळविल्यास आरसीबीचा प्लेऑफमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा होईल.
हार्दिकचे नाबाद अर्धशतक
या सामन्याआधी हार्दिकला अनेक सामन्यात मोठय़ा धावा करता आल्या नव्हत्या. पण या सामन्यात त्याने समाधानकारक प्रदर्शन करीत नाबाद 62 धावांची खेळी करून प्लेऑफची चांगली तयारी केली. त्याने 47 चेंडूंच्या खेळीत 4 चौकार व 3 षटकार मारले. प्रथम फलंदाजी निवडलेल्या गुजरातला आरसीबीने 10 षटकांत 3 बाद 72 धावांवर रोखले होते. यात वृद्धिमान साहाच्या जलद खेळीचा वाटा होता. त्याने 22 चेंडूत 31 धावा फटकावल्या. मात्र त्याचा सलामीचा जोडीदार केवळ एका धावेवर बाद झाला. पहिल्या स्लिपमध्ये मॅक्सवेलने उजवीकडे झेपावत त्याचा अप्रतिम झेल टिपला. मॅथ्यू वेड 16 धावांवर पायचीत झाला. पण त्याला हा निर्णय रुचला नाही. त्याने रिव्हय़ू घेतले तरी त्यात टीव्ही पंचांनी मैदानी पंचाचा निर्णय कायम ठेवला.
4 चौकार, एक षटकार मारणाऱया साहाला हार्दिककडून चांगली साथ मिळत होती. मात्र धाव घेताना गोंधळ झाल्याने साहा धावचीत झाला. 14 धावांवर जीवदान मिळालेल्या हार्दिकने त्याचा लाभ घेत डेव्हिड मिलरच्या साथीने संघाला सव्वाशे धावांपर्यंत मजल मारून दिली. 17 व्या षटकात मिलर 34 धावांवर बाद झाला. त्याने 25 चेंडूंत 3 षटकारांसह 34 धावांचे योगदान दिले. हसरंगाने त्याचा आपल्याच गोलंदाजीवर झेल टिपला. नंतर राहुल तेवातियाही 2 धावांवर बाद झाल्यावर रशिद खानने फटकेबाजी करीत 6 चेंडूत नाबाद 19 धावा फटकावताना हार्दिकसमवेत 36 धावांची भर घातली. रशिदने दोन षटकार ठोकत संघाला 170 च्या जवळपास मजल मारून दिली. गुजराने शेवटच्या पाच षटकातच 50 धावा काढल्या, त्यातील 34 धावा शेवटच्या दोन षटकातील होत्या. आरसीबीच्या हॅझलवुडने 2, मॅक्सवेल व हसरंगा यांनी एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स 20 षटकांत 5 बाद 168 : वृद्धिमान साहा 31 (22 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), गिल 1, वेड 16 (13 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 62 (47 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), मिलर 34 (25 चेंडूत 3 षटकार), तेवातिया 2, रशिद खान नाबाद 19 (6 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), अवांतर 3. गोलंदाजी ः हॅझलवुड 2-39, मॅक्सवेल 1-28, हसरंगा 1-25.
आरसीबी 18.4 षटकांत 2 बाद 170 : कोहली 73 (54 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), डय़ू प्लेसिस 44 (38 चेंडूत 5 चौकार), मॅक्सवेल नाबाद 40 (18 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), कार्तिक नाबाद 2, अवांतर 11. गोलंदाजी ः रशिद खान 2-32, शमी 0-23, यश दयाल 0-35, आर.साईकिशोर 0-20, हार्दिक पंडय़ा 0-35, फर्ग्युसन 0-21.