किरण ठाकूर यांचे प्रतिपादन : माधुरी शानभाग यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
प्रतिनिधी /बेळगाव
संगणक युगात विज्ञानाने प्रगती साधली आहे. त्यामुळे घरबसल्या आज विविध कार्यक्रम पाहू शकतो. अमेरिकेत वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. त्यामुळे वाचन संस्कृती वृद्धींगत होत आहे. त्याप्रमाणे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे विचार तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी व्यक्त केले.
प्रा. माधुरी शानभाग लिखीत ‘अवचिता परिमळू’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी उद्यमबाग येथील सेलिब्रेशन सभागृहात पार पडला. यावेळी किरण ठाकुर बोलत होते. व्यासपीठावर स्मिता शिरगावकर, संध्या देशपांडे, माधुरी शानभाग उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. राजश्री यांनी ईशस्तवन व गझल सादर केली.
किरण ठाकुर म्हणाले, आजच्या डिजिटल युगात पिंटींग क्षेत्र पुढे येत आहे. जोपर्यंत कागद उपलब्ध आहे तोपर्यंत पुस्तकांना आणि वृत्तपत्रांना कोणताही धोका नाही. छपाई क्षेत्रात प्रगती झाली असून, काही तासात कित्येक पुस्तकांची छपाई करणे सोयीस्कर झाले आहे. माधुरी शानभाग यांनी अनेक पुस्तके, लघुकथा अनुवाद हे साहित्यप्रकार हाताळले आहेत, 51 पुस्तके लिहून साहित्य क्षेत्रात अवाढव्य कार्य केले आहे, असे सांगत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी स्मिता शिरगावकर म्हणाल्या, माधुरी शानभाग यांनी घरात चांगले संस्कार देण्याबरोबरच साहित्य क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्यांच्या चांगल्या संस्कारामुळेच त्या उत्तम लेखिका बनल्या आहेत. यावेळी संध्या देशपांडे म्हणाल्या, चरित्र आणि आत्मचरित्र समाजावर मोठा परिणाम करतात आणि ती दीर्घकाळ टीकून राहतात. पुस्तकांचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. शिवाय वास्तवदेखील पुढे येते.
यावेळी लेखिका प्रा. माधुरी शानभाग यांनी आपल्या 51 व्या अवचीता परिमळू या पुस्तकाबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक सई रेगे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सई यांनी आभार मानले. याप्रसंगी रसिक, शानभाग कुटुंबीय उपस्थित होते.