नवी दिल्ली : झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी फेटाळण्यात आल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor )या दोघामध्ये काँग्रेसच्या (Congress) प्रमुखपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, लोकसभेचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी आपण खर्गे याच्याबरोबर जाहीर चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले.
पीटीआय ह्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत उमेदवारांमध्ये सार्वत्रिक वादविवाद असायला हवा का ? असे विचारले असता शशी थरूर म्हणाले की, ते या नव्या कल्पनेसाठी तयार आहेत” अशा प्रकारचा जाहीर वादविवाद ब्रिटीश कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वाच्या शर्यतीत दिसून आला होता.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी थरूर यांच्या उमेदवारीसाठी प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी करणारे अनिस सोझ यांनी आपल्या ट्विटरद्वारे ही कल्पना मांडली असून अशा वादविवादामुळे काँग्रेसच्या कार्य़कर्त्यांना आणि लोक प्रतिनिधींना या दोन नेत्यांची दृष्टी आणि पुढील योजना समजण्यास मदत होईल असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या ट्विटद्वारे अनिस सोझ म्हणाले “#TharoorElectionUpdate : डॉ. शशी थरूर हे मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी सार्वत्रिक चर्चेसाठी तयार आहेत, पण दोन्ही बाजूंनी यासाठी सहमती हवी. अशा सार्वजनिक वादविवादाने @INCIndia खूप लक्षवेधक ठरेल आणि काँग्रेस प्रतिनिधींना आणि जनतेला दोन्ही नेत्यांची दृष्टी आणि योजना समजून घेण्यास मदत होईल.”