प्रथम वीर बाल दिवशी पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील नागरिकांचा स्वाभिमान आणि देशाभिमान जागृत होईल, अशा प्रकारे भारताचा इतिहास आपल्याला शिकविलाच गेलेला नाही, अशा अर्थाचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सोमवारी प्रथमच ‘वीर बाल दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडास्थानी करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते भाषण करीत होते. सत्य इतिहास ज्ञात होण्याचे महत्व त्यांनी या कार्यक्रमात केरळपासून आसामपर्यंतची उदाहरणे देऊन विषद पेले.
मोगलांसह सर्व परकीय आक्रमकांना भारतातील स्थानिक योद्धय़ांनी आणि राजांनी मोठाच प्रतिकार केला होता. कित्येकदा त्यांनी या आक्रमकांना पराभूतही केले होते. मात्र, हा जाज्वल्य इतिहास आपल्यापासून लपविण्यात आला आहे. आता यापुढे तो विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. दहावे शीख गुरु गोविंदसिंग यांच्या दोन्ही पुत्रांनी औरंगजेबाविरोधात केलेले युद्ध आता विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. झोरावर सिंग आणि फतेह सिंग हे गुरु गोविदंसिंगांच्या वीरपुत्रांनी औरंगजेबाशी युद्ध करताना हौतात्म्य स्वीकारले होते. परकीय आक्रमकांनी त्यांचे हाल हाल करुन त्यांचे प्राण घेतले. हा पराक्रमी इतिहास लवकरच आपल्याला शिकविण्यात येणार आहे. हा इतिहास केवळ पंजाबमध्ये नव्हे, तर केरळपासून आसामपर्यंत सर्वत्र शिकविला जाणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
देशात सर्वत्र कार्यक्रम
वीर बाल दिवसानिमित्त देशभर गुरु गोविंदसिंग यांच्या पुत्रांच्या पराक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या निमित्त निबंध स्पर्धा, प्रश्नोत्तर स्पर्धा आणि इतर अनेक कार्यकमांचे आयोजन येते काही महिने केले जाणार आहे. रेल्वे स्थानके, पेट्रोलपंप, विमानतळ आदी सार्वजनिक स्थानी डिजिटल प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. रेल्वे स्थानकांवरही हे कार्यक्रम होणार आहेत.