पुणे / प्रतिनिधी :
चित्रपटांच्या माध्यमातून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी येथे व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या काळातील एक महत्त्वाची घटना म्हणजे ‘पुरंदरचा तह’. याच्या मूळ दस्तऐवजाचा मराठी अनुवाद करून पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘पुरंदरचा तह’ या पुस्तकाचे प्रकाशन संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘मराठी देशा फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. दामोदर मगदूम, छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टचे अमर जाधवराव, ‘पुरंदरचा तह’ पुस्तकाचे लेखक आणि राजस्थानच्या संग्रहालय आणि राज्य अभिलेखागार विभागाचे संचालक डॉ. महेंद्र खडगावत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धनीती कौशल्य, स्वाभिमान, समाजकारण-राजकारण, स्वराज्य निर्मितीमागचा उद्देश आणि त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. चित्रपटांतून विकृतीचा इतिहास दाखवून सत्य लपवणे, गैर असून त्याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. लोकांसमोर खरा इतिहास आला पाहिजे. ‘पुरंदरचा तह’ या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती व राजनीती कौशल्य दिसून येते. या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहास जगासमोर येणार आहे.