ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) गटाचे बंडखोर आमदार गोव्याहून (Goa) मुंबईसाठी (Mumbai) रवाना झाले आहेत. ते आज संध्याकाळी साडे सातपर्यंत मुंबईत येणार आहेत. मुंबईत आल्यानंतर सर्व आमदारांची राहण्याची सोय मुंबईतील ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे आपली सुरक्षा बाजूला ठेऊन आमदारांसोबत प्रवास करत आहेत. बंड करून महाराष्ट्र सोडल्यानंतर ११ दिवसांनी हे बंडखोर आमदार पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत. हे आमदार आधी सुरत, नंतर गुवाहाटी आणि शेवटी गोव्यात आले होते.
दरम्यान, ३ आणि ४ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. यावेळी नव्या सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे हे सर्व आमदार अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत येत आहे. तर शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांची उद्या ३ जुलै ला सकाळी भाजपच्या (bjp) काही नेत्यांसोबत बैठक होणार आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार तब्बल बारा दिवसानंतर राज्यात परत येत आहेत. ते आज दुपारी साडेचारनंतर गोव्याहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने बहुमत चाचणीसाठी सोमवारपासून दोन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे सर्व आमदारांना मुंबईत येणे गरजेचे आहे, त्यानुसार बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. भाजपचे बहुतांश आमदार मुंबईतच आहेत.