ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मानाच्या गणपतींमुळे पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला उशीर होतो. संकेत आणि परंपरेमुळे मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीआधी इतर मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीआधी पूर्व भागातील इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणुकीला परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका पुण्याच्या पूर्व भागातील दोन मंडळांनी केली आहे.
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची 130 वर्षांची मोठी परंपरा आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडईतून सुरू होते. लक्ष्मी रस्तामार्गे डेक्कन जिमखान्यावर मुठा नदीपात्रात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करून मिरवणूक संपते. दरवषी सुमारे 25 ते 30 तास मिरवणूक चालते. मात्र, याचा फटका मानाचे गणपती वगळता इतर गणपती मंडळांना विशेषत: पूर्व भागातील मंडळांना बसतो. पूर्व भागातदेखील शंभर वर्षापूर्वीपासून गणेशोत्सव करणारी अनेक मंडळे आहेत.
अधिक वाचा : मानाच्या गणपतींची उद्या थाटात प्रतिष्ठापना
रविवार पेठेतील 130 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या बढाई समाज तरूण मंडळ व पांगुळ आळी गणेश मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मानाच्या गणपती मंडळांमुळे विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत बारा-बारा तास थांबावे लागते. त्यामुळे वेळेत विसर्जन करता येत नाही. यावर उपाय म्हणून मानाच्या गणपती मंडळांच्या आधी लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी या दोन्ही मंडळांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.