एकंदर 3.39 लाख कोटी रुपयांची सरकारला प्राप्ती
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रत्यक्ष करांच्या संकलनात यावर्षीच्या आर्थिक वर्षात आतापर्यंत विक्रमी वाढ झाली आहे. एकंदर वाढ गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 45 टक्क्यांहून अधिक असून एप्रिल ते जूनचा मध्य या काळात एकंदर करसंकलन 3.39 लाख कोटी रुपयांच्या वर असल्याची माहिती देण्यात आली आहे. करदात्यांनी मोठय़ा प्रमाणात आगाऊ करभरणा (ऍडव्हॉन्स टॅक्स) केला आहे.
कंपनी कराचे संकलन 1.70 लाख कोटींचे झाले असून व्यक्तीगत प्राप्तिकर आणि व्यवहार सुरक्षा कर (सिक्युरिटी ट्रँझॅक्शन टॅक्स) यांचे संकलन 1.67 लाख कोटी रुपयांचे आहे. विद्यमान आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत आगाऊ करभरणा 1.01 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 75,783 कोटी रुपयांचा झाला होता. विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या साडेतीन महिन्यांमध्ये एकंदर प्रत्यक्ष कर संकलन 3,69,559 कोटी रुपयांचे आहे. ते गेल्या वर्षी याच कालावधीत 2,64,328 कोटी रुपयांचे होते.
अर्थव्यवस्था होत आहे सुरळीत
करसंकलात वाढ हे अर्थव्यवस्था सुरळीत होत असल्याचे सुचिन्ह आहे. बाजारात मागणी वाढत असून व्यापार आणि उत्पादन यांच्यात वाढ होत आहे. साहजिकच कंपन्यांची उलाढाल वाढली असून त्यामुळे कंपनी कराच्या संकलनात वाढ झाली आहे. करदात्यांचे व्यक्तिगत उत्पन्नही वाढत असल्याने प्राप्तिकर संकलनात वाढ झाली आहे. सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांमुळेही करसंकलनात वृद्धी होत असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.