पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमात दिलेली माहिती
प्रतिनिधी /फातोर्डा
ज्येष्ट नागरिक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. सध्या एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती आली आहे आणि कुटुंबातील तरुण शिक्षणासाठी वा नोकरी-व्यवसायासाठी घरापासून दूर राहत आहेत. अशा वेळी घरातील ज्येष्ट व्यक्तींचे? हाल होतात. कित्येक ज्येष्ट नागरिक घरात एकटेच राहतात? आणि ते बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यांना औषधे आणून देण्यासाठी किंवा आवश्यक सामान आणून देण्यासाठीही घरात कोणी नसते. अशा नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार मदत करण्यासाठी 3500 बीट पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी मडगाव रवींद्र भवनाच्या परिषदगृहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिली.
अखिल गोवा ज्येष्ट नागरिक संघटन तर्फे जागतिक ज्येष्ट नागरिक दिनानिमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे म्हणून मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, आमदार क्रूझ डिसिल्वा, कारे कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा डिसिल्वा, संघटनेचे अध्यक्ष डायगो डिकॉस्ता व सचिव ऍड. निकलांव कुलासो उपस्थित होते. पुढे बोलताना सिंग म्हणाले की, ज्या ज्या पोलीस ठाण्यात पोलीस कमी आहेत तेथे नवीन कॉन्स्टेबल्सची नियुक्ती केली जाईल. यासाठी पोलीस खात्यात 900 कॉन्स्टेबल्सची भरती करण्यात येणार आहे. पोलिसांसाठी नवीन वाहनेही खरेदी करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, पूर्वी प्रोव्हेदोरियामार्फत ज्येष्ट नागरिक संघटनेला अनुदान मिळायचे. आता त्याचे काय झाले, असा प्रश्न त्यांनी केला. ज्येष्ट नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱया संस्थांना सरकारचे अनुदान मिळत नाही, मग त्या कशा चालणार. गोव्यात ज्येष्ट नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारची सोय नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यांना घरात राहू शकणाऱया पारिचारिकेची गरज असते, जी गोव्याची असायला हवी म्हणजे तिला कोकणी भाषा समजेल. परंतु या परिचारिका बाहेरील राज्यांतून आणाव्या लागतात, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
जेष्ठांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे आहे, जी होत नाही. तसेच निराधार ज्येष्ट नागरिकांना राहण्यासाठी निवारास्थळाची गरज आहे. परंतु यातील काहीही सरकारकडून दिले जात नसल्याने हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याचे आश्वासन सरदेसाई यांनी दिले. यावेळी आमदार कामत आणि साबा डिसिल्वा यांनीही आपले विचार मांडले. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱया व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. सतीश कुडचडकर (वैद्यकीय), अमिता नुरानी (समाजसेवक), दिनानाथ आमोणकर (स्वातंत्र्यसैनिक), राया नाईक (शैक्षणिक), इबोनियो डिसोझा (साहित्यिक), बाबू कोमरपंत ( शेतकरी), रामनाथ देसाई (क्रीडा), विल्सन माझारेलो (तियात्रिस्ट) यांचा समावेश राहिला. डायगो डिकॉस्ता यांनी स्वागत केले, तर आभार ऍड. निकलांव कुलासो यांनी मानले.